70.29 टीएमसी पाणीसाठा, धबधबे ओसंडून वाहू लागले
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारी पाण्याची आवकही मंदावली. मात्र गेल्या चोवीस तासांपासून धारण पाणलोट क्षेत्रात कोसळलेल्या धुवाँधार पावसामुळे अद्यापही धरणात प्रतिसेकंद 34 हजार 163 क्युसेक्स या वेगाने आवक सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठय़ाने शुक्रवारी सायंकाळी सत्तरी ओलांडली. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे कोयना परिसरातील लहान, मोठे धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तसेच गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा वेग मंदावला आहे. दिवसभर उघडझाप होत असल्यामुळे सूर्यदर्शनही झाले आहे.
सोमवारपासून कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ सुरू झाली आहे. मात्र आज शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली. मात्र गेल्या चोवीस तासांपासून कोसळलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठय़ात अद्यापही प्रतिसेकंद 34 हजार 163 क्युसेक्स इतकी आवक सुरू असल्याने शुक्रवारी सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा 70.29 टीएमसीवर पोहोचला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील ओझर्डे धबधब्यासह लहान मोठे धबधबे ओसंडून कोसळताना दिसत आहेत.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चोवीस तासांत कोयनानगर येथे 150 (2697) मिलिमीटर, नवजा 107 (2864) मिलिमीटर, महाबळेश्वर 147 (2778) आणि वळवण 111 (3458) मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
सातारा शहरात उघडझाप
गेल्या दोन तीन दिवसांपासून संततधार कोसळणाऱया पावसाने शुक्रवारी सकाळपासून उघडझाप करत हजेरी लावली. पावसाचा वेग मंदावला असून पश्चिम महाबळेश्वर, कोयना व नवजा परिसरात रिमझिम बरसात सुरु आहे. मात्र कराड, पाटणसह साताऱयात दुपारनंतर उघडीप दिली होती. काही वेळा चक्क सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने रस्त्यावर वर्दळ दिसू लागली होती.
पावसाचा वेग मंदावल्याने पूर्व भागातील माण, फलटणमध्ये पावसाने विश्रांतीच घेतली. तर खटाव व कोरेगावात अल्पशा पावसाची नोंद झाली आहे. पाटण व जावली तालुक्यात पावसाची चांगली नोंद आहे तर कराड व साताऱयात दिवसभर उघडझाप सुरु असल्याने मधून सूर्य तळपत होता. ऊन व पावसाचा खेळात निसर्गाचे रुप मनमोहक हिरवाईने नटले असून या पावसाने सध्या तरी पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पश्चिम भागात रिमझिम सुरुच असून तिकडे भातलागणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण यावर्षी कमीच आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे पावसाअभावी पिके हातची जाण्याची भीती निर्माण झाली होती. जून व जुलै महिन्यात आवश्यक तेवढा पाऊस न झाल्याने फुलोऱयात आलेली पिके वाळून जाण्याएवढी स्थिती निर्माण होवू पहात असतानाच ऑगस्टमधल्या पावसाने दिलासा आहे.
गेल्या 24 तासात जिह्यात 19.28 मि.मी. पाऊस
जिह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 19.28 मि. मी. पाऊस झाला आहे. जिह्यात शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 19.58 (461.29), जावली 30.73 (826.58), पाटण 38.82 (781.18), कराड 13.85 (373.92), कोरेगाव 5.00 (323.72), खटाव 3.38 (285.42), माण 0.00 (264.14), फलटण 0.00 (257.40), खंडाळा 2.70 (289.90), वाई 9.30 (457.97), महाबळेश्वर 144.28 (2858.38) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 7179.89 मि. मी. तर सरासरी. 652.72 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सातारा जिह्यातील इतर प्रमुख धरणातील शुक्रवारी सकाळी 8 वाजेपर्यंत उपयुक्त पाणीपातळी टी. एम. सी. मध्ये व टक्केवारी कंसात पुढीलप्रमाणे. धोम 6.47 (55.38), धोम बलकवडी 3.03 (76.64), कण्हेर 6.12 (63.83), उरमोडी 7.41 (76.81), तारळी 3.52 (60.29), निरा-देवघर 5.01 (42.72), भाटघर 13.07 (55.60), वीर 6.12 (65.08).