प्रतिनिधी / नवारस्ता :
संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यासाठी संजीवनी ठरलेल्या सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाणीसाठ्याने शंभर टीएमसीचा टप्पा ओलांडला. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी हे धरण पूर्ण क्षमतेने भरेल. त्यामुळे यावर्षी संपूर्ण राज्याची तहान भागून राज्यातील विजेचाही प्रश्न सुटणार आहे. परिणामी यावर्षीही राज्यावरील भारनियमाचे संकट टळले आहे.
यावर्षी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अगदी कमी कालावधीत धरणाच्या पाणीसाठय़ात झपाटय़ाने वाढ झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला धरणाची पाणीपातळी केवळ 12 टीएमसी होती. मात्र जून व जुलैमध्ये कोयना पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अवघ्या पंधरा दिवसांत धरणाच्या पाणीसाठय़ाने तब्बल 80 टीएमसीचा टप्पा ओलांडला. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ापासून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढू लागला असून गणेशोत्सवाच्या आगमनादिवशीच धरणाच्या पाणीसाठय़ाने 100 टीएमसीचा टप्पा ओलांडला. दरम्यान, 105.25 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणारे कोयना धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठय़ावर आहे.