पावसाचा जोर वाढला, धरणातील पाणीसाठा 52.29 टीएमसी
प्रतिनिधी/ नवारस्ता
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवकही कमी झाली होती. मात्र गेल्या 24 तासांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्यामुळे आठ दिवसांपासून पन्नाशीच्या उंबरठय़ावर असणाऱया कोयना धरणाच्या पाणीसाठय़ाने रविवारी पहाटे अखेर पन्नाशी ओलांडली. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात 52.29 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
कोयना पाणलोट क्षेत्रात जून महिन्यात चांगला पाऊस कोसळला. मात्र जुलै महिन्यात काही दिवस अपवाद वगळता पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक कमी होऊन पाणीसाठय़ात अत्यंत संथपणे वाढ सुरू झाली. परिणामी पन्नाशीच्या उंबरठय़ावर असलेला धरणातील पाणीसाठय़ाला पन्नाशी गाठण्यासाठी तब्बल आठवडाभर वाट पाहावी लागली. मात्र गेल्या 24 तासांपासून पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या पाणीसाठय़ात येणारी पाण्याची आवक वाढू लागली आहे. शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱया पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने रविवारी धरणाच्या पाणीसाठय़ाने पन्नाशी ओलांडली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाच दिवस उशिरा पाणीसाठय़ाने पन्नाशी गाठली. गतवर्षी 24 जुलै रोजीच धरणाच्या पाणीसाठय़ाने पन्नाशी ओलांडली होती.
गेल्या 24 तासांत कोयनानगर येथे 69 (1332) मिलिमीटर, नवजा येथे 136 (1862) आणि महाबळेश्वर येथे 130 (1893) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात प्रतिसेकंद 23 हजार 616 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून पाणीसाठा 52.29 टीएमसी झाला आहे.