प्रतिनिधी / सातारा :
यावर्षी जूनमध्ये कोसळलेला मान्सून, उन्हाळ्यात पडलेल्या अवकाळी पाऊस यामुळे जुलै महिन्यात पावसाने ओढ दिली असली तरी गतवर्षीच्या जुलैपेक्षा यावर्षी सर्व धरणांमध्ये चांगला पाणीसाठा आहे. सध्या जिल्ह्याला जोरदार पावसाची अपेक्षा असली तरी पाऊस तुरळक स्वरुपात पडत आहे. पश्चिम भागात पावसाची अधून मधून रिमझिम सुरु असून, त्यातच भात लावण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, जिल्हय़ात आजमितीपर्यंत सरासरी 90.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंचन मंडळाकडून आलेल्या माहितीनुसार, सध्या कोयना धरणात 46.31 टीएमसी पाणी साठा असून, गतवर्षी जुलैमध्ये तो 42.36 टीएमसी होता. त्याचप्रमाणे धोम 4.75, धोम बलकवडी 2.01, कण्हेर 4.32, उरमोडी 5.32 व तारळी धरणात 3.83 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षी जुलैपेक्षा थोडा जास्त पाणी साठा या धरणांमध्ये असून गतवर्षी जुलै महिन्यात या सर्व धरणांमध्ये 61.46 टीएमसी पाणी साठा होता. यावर्षी तो 66.60 टीएमसी म्हणजे 5.60 टीएमसी एवढा जादा साठा आहे.
त्या पध्दतीने येरळवाडी, नेर, राणंद, आंधळी, नागेवाडी, मोरणा गुरेघर, उत्तरमांड, कुडाळी महू, कुडाळी हातगेघर, वांग मराठवाडी या मध्यम प्रकल्पांमध्ये देखील गेल्या वर्षी जुलै महिन्यात एकूण 2.21 टीएमसी पाणी साठा उपलब्ध होता. यावर्षीच्या जुलैमध्ये त्यात वाढच असून तो 3.03 टीएमसी एवढा आहे. या सर्व धरण क्षेत्रात अधून मधून रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहे.
दरम्यान, सध्या जिल्हय़ात पावसाने ओढ दिलेली आहे. मात्र, पश्चिम भागात अधून मधून रिमझिप पावसाची बरसात होत आहे. याच्या जोरावरच सध्या भात लावणीचे काम सुरु आहे. यावर पिके जगवली जात असली तरी तगवण्यासाठी मोठया पावसाची वाट शेतकरी पाहत आहे.