प्रतिनिधी / सांगली
कोयना व वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही धरणातून विसर्ग कमी करणेत आला आहे. वारणा धरणातून 9112 क्युसेस विसर्ग सुरु होता. तो आता कमी करुन 4517 करणेत आला आहे. सकाळी 11 वाजता कोयनेचा विसर्ग सुमारे 20 हजार क्युसेस कमी करुन 31038 क्युसेस वर आणला होता. अलमट्टीतून दोन लाख 50 हजार क्युसेस विसर्ग सुरुच आहे. कोयना, नवजा व महाबळेश्वर परिसरात सकाळपासून केवळ 8 मी मी पावसाची नोंद आहे. कृष्णा नदी धोकारेषेच्या खालून सुरक्षित वाहते आहे. सांगलीत 45 फूट धोकापातळी आहे. पण सध्या पाणी पातळी 38.6 फुटांवर आहे. राजापूर बंधार्याजवळ 58 फूट धोकापातळी आहे. तेथे 49 फूटांवर पाणी पातळी आहे. कराड कृष्णा पूलाजवळ 55 फूट धोकापातळी आहे. तर तेथे पाणी उतरले असून जेमतेम 25 फूट पाणी पातळी आहे. पावसाचा जोर उतरल्याने महापूराच्या संकटातून तूर्तास तरी सुटका झाली आहे.