रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. मात्र अंतर्गत रस्त्यांकडे महापालिका प्रशासनासह स्मार्ट सिटी कंपनीचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बेळगाव आणि शहापूर परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली असून, कोरेगल्ली रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
महात्मा फुले रोडसह आनंदवाडीमार्गे जाणाऱया वडगाव रस्त्याचे तसेच गोवावेस रस्त्याचा आणि जुना महात्मा फुले रोड अशा विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. शहापूर आणि बेळगाव परिसरातील प्रमुख आणि वर्दळींच्या रस्त्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. शहापूरचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱया कोरेगल्ली-जेड गल्ली कॉर्नरच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. डाकबंगला परिसरात या रस्त्यावर खड्डय़ाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहापूर परिसरात येण्यासाठी डाकबंगल्याकडून कोरेगल्ली, जेडगल्लीमधील या रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. पण हा रस्ता विकासापासून वंचित आहे. जेडगल्ली आणि कोरेगल्ली कॉर्नर ते डाकबंगल्यापर्यंत रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे रस्त्याचा विकास करणे गरजेचे आहे. पण महापालिकेने अंतर्गत रस्त्यांच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
स्मार्ट सिटीच्या नावाखाली अंतर्गत रस्त्यांचा विकास करण्याकडे कानाडोळा करण्यात आल्याने स्मार्ट सिटी संकल्पनेचा बोजवारा उडाला आहे.