रहिवाशांची आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कोरे गल्ली, शहापूर येथील 5 ते 6 विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. मध्यंतरी महानगरपालिकेने या विहिरींचे पाणी स्वच्छ करूनही ते पुन्हा दूषित झाले आहे. या पाण्यात सांडपाणी झिरपत असल्याने ते पाणी खराब होत आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याने या समस्येवर कायमचा तोडगा काढावा, अशी मागणी कोरे गल्ली रहिवाशांनी सोमवारी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
डेनेज पाईपलाईनमधून गळती होऊन ते थेट विहिरींच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने विहिरींचे पाणी दूषित होत आहे. याबाबत वारंवार महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे. मध्यंतरी आयुक्तांनी सकिंग मशीन पाठवून विहिरी स्वच्छ केल्या. परंतु त्यामध्ये पुन्हा दूषित पाणी येऊन मिसळल्याने पुन्हा खराब झाले आहे. यामुळे या परिसरात पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करू लागला आहे. त्यामुळे या परिसरात नवीन डेनेजची पाईप घालून ही समस्या कायमची दूर करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. कोरे गल्ली येथील नागरिकांच्यावतीने अभिजित मजुकर यांनी महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी संजय डुमगोळ यांना निवेदन दिले. या समस्येबाबत अधिकाऱयांशी चर्चा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.