मुख्यमंत्री यांची स्पष्टोक्ती
प्रतिनिधी / पणजी
कोरोंटाईन करण्यात येणाऱया खलाशांकडून सरकार पैसे आकारणार नाही. मात्र काही शिपिंग कंपन्या व एजंटस यांनी स्वेच्छेने कोरोंटाईनचे पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे. हे पैसे ते आपल्या कर्मचाऱयांच्या सुविधेसाठी भरायला तयार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
खलाशांना कोरेंटाईन करण्यासाठी पैसे आकारले जात असल्याची माहिती पसरल्याने त्यावरून गोंधळ निर्माण झाला होता. सरकारवरही यामुळे टीका सुरू झाली. मात्र हा विषय लोक विनाकारण चर्चेला आणीत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. सरकारने कोणत्याही खलाशांकडून वैयक्तिकरित्या कोरोंटाईन करण्यासाठी पैसे घेतलेले नाहीत. मात्र बोट मालकांनीच सरकारला पत्र लिहून पैसे भरण्याची तयारी दर्शविली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मारेला डिस्कव्हरी या बोटीवरील 54 खलाशांना गोव्यात आणलेले आहे. त्यांना 14 दिवस कोरोंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढे आणखी 14 दिवस त्याना घरात कोरोंटाईन केले जाईल. या सर्वांची कोरोना चाचणी केली आहे. सर्वांचे अहवाल नकारात्मक आले आहेत. मात्र त्यांची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. 60 पैकी 6 खलाशी जे मारेला डिस्कव्हरी बोटीवर होते ते कर्नाटकातील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
आंग्रीया, कर्णिका पोर्ट सचिवाच्या संपर्कात
मुंबईत असलेल्या अन्य दोन बोटी कर्णीका व आंग्रीया बंदर सचिव पी. एस. रेड्डी यांच्या संपर्कात आहे. या बोटीवरील खलाशांना गोव्यात आणण्यासाठी मान्यता मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सर्व खलाशांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.