प्रा. डॉ. अनिल कालकुंद्रीकर यांचे प्रतिपादन : आविष्कार उद्योजक संस्थेतर्फे मार्गदर्शनपर व्याख्यान
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना हे संकट मानले तरी या संकटात तग धरून राहण्यासाठी संधी शोधायला हवी. कोरोनाने औद्योगिक जगतात अनेक उलथापालथी घडविल्या. अशा परिस्थितीत सध्या जास्त नफ्यावर भर न देता जगण्यासाठी आवश्यक तेवढाच नफा कमविण्यावर भर द्यायला हवा, असे मत अर्थतज्ञ प्रा. डॉ. अनिल कालकुंद्रीकर यांनी व्यक्त केले.
कोरोनानंतरच्या काळात महिलांनी आपल्या उद्योग व्यवसायात कोणते बदल करावेत, याबद्दल आविष्कार उद्योजक संस्थेने मंगळवारी डॉ. कालकुंद्रीकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन केले होते. आयएमईआरच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर आविष्कारच्या अध्यक्षा सुलभा खानोलकर, समन्वयक कीर्ती शिवकुमार, संस्थेचे चेअरमन ऍड. मुतालिक, संचालक डॉ. अतुल देशपांडे आदी उपस्थित होते.
उद्योग-व्यवसायात बदल करणे अपरिहार्य
डॉ. कालकुंद्रीकर म्हणाले, 2020 हे काळोखी वर्ष आहे. ज्याने लघु व्यवसायावर संक्रांत आणली. या वर्षाने आरोग्य व सुरक्षितता हा महत्त्वाचा धडा दिला. त्याच प्रमाणे हे वर्ष बदलाचे व्यवस्थापन शिकवणारे वर्ष आहे. त्यामुळे आपल्या उद्योग-व्यवसायात बदल करणे अपरिहार्य ठरणार आहे.
सर्वप्रथम आपण नकारात्मक दृष्टिकोन सोडला पाहिजे व काय शिकू शकतो, याचा विचार केला पाहिजे. आपल्या उत्पादनात वैविध्यता आणली पाहिजे. पॅकबंद पदार्थ आणि वस्तूंना मागणी वाढली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणताही व्यवसाय नफ्यासाठी असला तरी सध्याच्या काळात जास्त नफ्यावर लक्ष न ठेवता जगण्यासाठी आवश्यक तेवढाच नफा कमविण्यावर भर द्यायला हवा.
कामगारांच्या पगाराची पुनर्रचना करा. कच्च्या मालावर कमी गुंतवणूक करा. ऑर्डरनुसारच त्यामध्ये वाढ करा. उद्योगांना मिळणारे कर्ज शक्मयतो कमीत कमी घ्या, कोठून येणे बाकी असेल तर त्याकडे लक्ष द्या, महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानाचा अवलंब करा, अशा टीप्स त्यांनी दिल्या.
कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ढळू देऊ नका
आपण उद्योग सुरू करतो, पण मार्केटिंग करत नाही. त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो. सध्याच्या काळात मार्केटिंग करताना आपल्या वितरण व्यवस्थेत बदल करा, घरपोच सेवा देण्यावर भर द्या, विविध ठिकाणी आपली उत्पादने ठेवण्याचा प्रयत्न करा. मात्र कोणत्याही परिस्थितीत आत्मविश्वास ढळू देऊ नका, अशा टीप्स डॉ. कालकुंद्रीकर यांनी दिल्या.
प्रारंभी सुलभा खानोलकर यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. डॉ. अतुल देशपांडे यांनी काळाची गरज ओळखून उद्योग व्यवसायात बदल करणे भाग आहे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना ऍड. मुतालिक यांनी कोरोनाने चांगलाच धडा शिकविला. क्वारंटाईन होणे म्हणजे काय हे दाखवून दिले. परंतु समस्या आहेत तिथे उत्तरेही आहेत. त्यामुळे आपण धीर सोडू नये, असे आवाहन केले.
माजी अध्यक्षा मनीषा बदानी यांच्या हस्ते पाहुण्यांना भेटवस्तू देण्यात आली. कीर्ती शिवकुमार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.