आंदोलनामुळे सोशल डिस्टन्सचा उडाला फज्जा
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्या देशामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगामुळे हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर लाखो लोक कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. सरकारनेच कोरोनापासून बचाव करण्यासाठी विविध नियम घालून दिले आहेत. कोरोना विरोधात लढत असताना सरकार मात्र देशातील जनतेच्या विरोधात विविध विधेयके मंजूर करत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स असो वा इतर नियम साऱयांनाच मोडावे लागत आहेत. शेतकऱयांच्या या आंदोलनावेळी सोशल डिस्टन्स पाळणे कठीणच होते. त्यामुळे आता आणखी कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
देशातील व जगातील जनता कोरोनासारख्या रोगाशी लढा देत आहे. या लढाईबरोबर सरकारविरोधात रस्त्यावर उतरणे अवघड झाले आहे. अनेक विधेयके सरकार घाईघाईने मंजूर करत आहे. वास्तविक कोरोनासारख्या भयानक आजाराबरोबर लढण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशा कालावधीतच शेतकरी, कामगार व इतर घटकांच्या विरोधात सरकार विधेयके मंजूर करत आहे, असा आरोप काही शेतकऱयांनी केला आहे.
कोरोनामुळे सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे आहे. मात्र मोर्चावेळी सोशल डिस्टन्स ठेवायचे कसे? असा सवालदेखील शेतकऱयांनी केला आहे. माजी नगरसेवक आणि ऍड. अमर यळ्ळूरकर यांनी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सर्वसामान्य जनता कोरोनाबरोबर लढाई लढत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. उपचार वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. असे असताना केंद्र सरकार मात्र नवीन विधेयके मांडून ती मंजूर करत आहे, हे अत्यंत चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले.