बिहारच्या बक्सर जिल्हय़ात घबराट
@ आरा / वृत्तसंस्था
बिहारच्या बक्सर जिल्हय़ात गंगा नदीत तीस-चाळीस मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचे आहेत, असे सांगण्यात आले. त्यामुळे नदीकाठच्या प्रदेशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मृतदेह कोणत्या राज्यातील आहेत यावर आता वाद सुरू झाले आहेत.
सोमवारी सकाळी बिहारच्या बक्सर जिल्हय़ात असे मृतदेह गंगेच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले. बेवारस मृतदेहांची विल्हेवाट त्यांना गंगा नदीच्या पात्रात लोटून लावण्याची पद्धत उत्तर प्रदेश व बिहारमध्ये अनेक शतकांपासून आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी ज्यांना कोणीही वारसदार नाहीत, अशांपैकी काही जणांचे मृतदेह याप्रकारे गंगार्पण केले जातात. तथापि, एकाच वेळी इतक्या मोठय़ा संख्येने मृतदेह तरंगताना दिसून आल्याने नागरीकांचा संशय बळावला.
हे मृतदेह कोरोनाग्रस्तांचेच आहेत किंवा नाहीत, यासंबंधी त्वरित अधिकृत स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही. तथापि, सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असल्याने तशी शंका बक्सर जिल्हय़ातील लोकांना येत आहे. प्रशासनाने अद्याप या मृतदेहांसंबंधी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. तपासणी झाल्यानंतरच याचा खुलासा करता येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे.
हे मृतदेह बिहारमधीलच आहेत की नाहीत, यासंबंधीही स्पष्टता नाही. बक्सर येथील प्रशासकीय अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वहात आले आहेत. मात्र, उत्तर प्रदेशने हे म्हणणे मानलेले नाही. हे मृतदेह सध्या कुजलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे त्यांची तपासणी करणेही धोक्याचे आहे, असे सांगण्यात येत आहे. तथापि, उत्तर प्रदेश आणि बिहार प्रशासनांनी यावर स्पष्टीकरण द्यावे, आणि लोकांची भीती दूर करावी, अशी मागणी होत आहे.