पणजी /प्रतिनिधी
उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये मोठय़ा प्रमाणात कोरोनाचा फैलाव नव्याने सुरू झाल्याने सर्वत्र हाहाकार माजलेला असताना गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या बरीच घटत चाललेली आहे, या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील पर्यटकांनी राज्यातील समुद्रकिनाऱयांवर तसेच हॉटेलांमध्ये तुफान गर्दी केली आहे. ते कोरोना संसर्गाची मार्गदर्शक तत्वे पाळत नसल्याने गोव्याला देखील कोरोनाचा नव्याने धोका निर्माण होण्याची शक्मयता आहे. संतापजनक बाब म्हणजे गोव्याच्या हद्दीमध्ये शिरताना या पर्यटकांची कोणतीही योग्य चाचणी होत नाही.
राज्यातील किनारी भाग तसेच विविध पर्यटन स्थळे सध्या पर्यटकांनी भरुन गेली आहेत. गेल्या पाच महिन्यांमध्ये गोव्याकडे पर्यटक फिरलेला नव्हता परंतु आता मोठय़ा प्रमाणात देशी पर्यटक गोव्यात पोचले आहेत. यावषी विदेशी पर्यटकांची संख्या त्या तुलनेत अत्यल्प आहे, मात्र सध्या कोरोना रुग्णांची संख्या गोव्यात घटली असल्याने तसेच देशभरातील विविध भागात कोरोना संक्रमणचे प्रमाण कमी झाल्यानंतर पर्यटकांचा पुन्हा गोव्याकडे ओढा निर्माण झाला आहे.
कोरोनाग्रस्त राज्यांतील पर्यटकांची गोव्यात गर्दी
उत्तर भारतात थंडीची लाट सुरू झाली असल्यामुळे उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, बिहार, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अशावेळी त्या भागातील लोकांना कोरोना संसर्ग असह्य होत असल्याने काहीजण पर्यटक बनून गोव्यात आलेले आहेत. तथापि या पर्यटकांची कुठेही तपासणी केली जात नसल्याने गोव्यात नव्याने कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्मयता आहे.
गुजरातमध्ये कोरोनामुळे संचारबंदी लागू
या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी कोणतेही प्रयत्न दुर्दैवाने केले जात नाहीत. त्यामुळे पुढील पंधरा दिवसात गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या जर वाढली तर कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नये. सध्या गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये संक्रमण प्रचंड प्रमाणात फैलावल्याने तिथे कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
राज्यातील सर्व किनाऱयांवर पर्यटकांची गर्दी
हिमाचल प्रदेशमध्ये देखील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सध्या वाढणारे कोरोना रुग्ण आणि मरणाऱयांची वाढती संख्या लक्षात घेऊन तिथे मोठय़ा प्रमाणात खबरदारीचे उपाय हाती घेतले जात आहेत. कदाचित दिल्लीमध्ये देखील नव्याने संचारबंदी लागू होण्याची शक्मयता आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता गोव्यात मात्र पर्यटक मोठय़ा प्रमाणात येत आहेत. सध्या गोव्यातील बहुतेक सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी भरून गेलेले आहेत. तसेच किनारी भागातील जवळपास सर्वच हॉटेल्स सुरू झालेली आहेत. हे पर्यटक कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करत नाही, ही गोव्यासाठी मोठी धोकादायक बाब आहे.
पणजीतील अनेक हॉटेलमध्ये सध्या पर्यटक मोठय़ा प्रमाणात दाखल झालेले आहेत. या पर्यटकांची योग्य तपासणी केली जात नसल्याने विविध भागातून येणारे पर्यटक येताना कोरोनाची लागण घेऊन येतील आणि गोव्यामध्ये नव्याने तो मोठय़ा प्रमाणात फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. सरकार कोणत्या उपाययोजना हाती घेते, हे आता पहावे लागेल.