कोरोनाकाळात अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. अनेक चालते-बोलते व्यवसाय बंद करावे लागले आहेत किंवा त्यांची कोंडी झालेली सहन करावी लागत आहे. अनेकांच्या नोकऱया गेल्या आहेत. तथापि, याच कोरोनाने अनेकांना नव्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्याची प्रेरणाही दिली आहे. कोरोनाकाळात लोकांच्या बदललेल्या आवश्यकता लक्षात घेऊन अविनाश राघव नामक एका कल्पक व्यावसायिकाने लॉजिस्टिक सर्व्हिसेस स्टार्टअप् सुरू केला असून अवघ्या नऊ महिन्यात त्याची उलाढाल 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच 70 लोकांना या स्टार्टअप्ने रोजगार मिळवून दिला आहे.
अविनाश राघव मूळचे झारखंड राज्यातील जमशेदपूर येथील आहेत. 1999 मध्ये इंजिनियर झाल्यानंतर ते दिल्लीत स्थायिक झाले. सात वर्षे त्यांनी वेगवेगळय़ा कंपन्यांमध्ये नोकरी केली. 2006 मध्ये ते मध्यपूर्वेत गेले. तेव्हापासून 2020 पर्यंत तेथेच होते. तेथे ते व्यावसायिक कंपन्यांसाठी बिझनेस ऍनॅलिस्ट तसेच धोरण निर्धारक म्हणून काम करीत होते. त्यामुळे त्यांना अनेक उद्योग व्यवसायांचा अनुभव प्राप्त झाला.
कोरोनाकाळात अनेकांच्या जीवनाची समीकरणेच बदलली. अनेकांना घरातून काम करावे लागले. बाजारात जाऊन रमतगमत खरेदी ही संकल्पना मागे पडली. आवश्यक त्या वस्तू घरबसल्या मिळाल्यास उत्तम अशी नवी भावना ग्राहकांच्या प्रकर्षाने निर्माण झाली. यातून स्फूर्ती घेऊन त्यांनी लॉजिस्टिक सर्व्हिसेस स्टार्टअप् कंपनी सुरू केली. लोकांच्या घरातील सामान व वस्तू दुसऱया घरात घेऊन जाण्याचे काम ही कंपनी करते. तसेच नव्या ठिकाणी या सर्व वस्तू आणि ऍप्लायन्सेस यांची मांडणी आणि जोडणीही करून देते. घराचा मालक तेथे उपस्थित नसला तरी सर्व काम त्याच्या इच्छेनुसार विश्वासाने केले जाते. त्यामुळे अनेक जण या कंपनीच्या सेवेवर विसंबून राहू लागले आहेत. विश्वासार्हता हा आपल्या व्यवसायाचा प्रमुख गुणधर्म असल्याचे राघव सांगतात. कोणत्याही संकटातून संधी शोधण्यातच कोणत्याही व्यावसायिकाचे खरे बुद्धीकौशल्य पणाला लागते, असे त्यांचे म्हणणे आहे.