देशातील कोरोना रुग्णांची घटती संख्या पाहता पुढच्या महिन्यापर्यंत अनेक राज्यांमधील कोरोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असेल, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले आहे. तर मार्चच्या तिसऱया आठवडय़ात कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात येईल, असा अंदाज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. ही महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्लीसह एकूणच देशासाठी दिलासादायक बाब ठरावी. विविध राज्यांमधील एकूणच स्थिती पाहता कोरोनाचा उतार सुरू झाला आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल. पहिल्या व दुसऱया लाटेने देशाला जबरदस्त तडाखा दिला. दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरातसह अनेक राज्येच्या राज्ये या लाटेमध्ये बाधित झाली. आजतागायत भारतात या आजाराने पाच लाखांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. वास्तविक, महामारीतील बळींचा खरा आकडा कुणीही सांगू शकत नाही. परंतु, यात लाखोंचा बळी गेला, असे निश्चितपणे म्हणता येईल. पहिल्या व दुसऱया लाटेनंतर तिसऱया लाटेचे उपद्रवमूल्य किती असणार, याबाबत मतमतांतरे व धाकधूकही होती. सुदैवाने तिसरी लाट वा ओमिक्रॉनच्या विषाणूचा तितकासा प्रभाव जाणवला नाही, हे शुभचिन्हच म्हणायला हवे. लसीकरण, दक्षता व लोकांच्या प्रतिकारकशक्तीत झालेली वाढ अशा अनेक घटकांचा हा परिणाम मानता येईल. महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला, तर येथील दैनंदिन रुग्णसंख्या मागच्या महिन्यात साधारणपणे 48 हजारांवर गेली होती. ती आता 10 ते 15 हजारांच्या खाली येणे, हे बरेच काही सांगून जाते. पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई ही राज्यातील महत्त्वाची व मुख्य शहरे असून, उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येथे मोठय़ा संख्येने नागरिकरण झाले आहे. स्वाभाविकच येथे रुग्णसंख्या अधिक असणे, हे ओघाने आलेच. परंतु, जितक्या वेगाने येथे कोरोनाचा फैलाव झाला, तितक्याच वेगाने तो ओसरला, असे पहायला मिळते. ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या तर अगदीच नगण्य असल्याचे दिसून येते. स्वाभाविकच निर्बंध टप्प्याटप्प्याने कसे कमी करता येतील, यादृष्टीने आता पावले पडायला हवीत. पहिल्या व दुसऱया लाटेत निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. तर तिसऱया लाटेतही कठोर नियम लावण्यात आले. कोरोनासारख्या महामारीशी लढताना निर्बंध वा नियम आवश्यकच असतात. परंतु, नियमांच्या चौकटी कायम राहिल्या, तर त्यातून एकूणच अर्थचक्राच्या वेगावरच परिणाम होत असतो. पहिल्या दोन लाटांमध्ये हे चाक जवळपास थांबल्यातच जमा होते. त्यामुळे अनेकांना रोजगार गमवावा लागला. तिसऱया लाटेत निर्बंध असले, तरी व्यवहार बऱयाच अंशी सुरू होते. त्यामुळे उद्योग, व्यवसाय अथवा व अन्य क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम दिसून आला नाही. तरीदेखील आजही पूर्वीप्रमाणे 100 टक्के अर्थचक्र सुरू आहे, असे म्हणणे धारिष्टय़ाचे ठरेल. हे पाहता शहरे, नगरे पूर्वीप्रमाणे निर्बंधमुक्त होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या अनेक शहरांतील शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. तर हॉटेल, जिम, चित्रपटगृहे वा अन्य ठिकाणी सध्या 50 टक्के उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. ही बंधने जितक्या लवकर उठतील, तितक्या गतीने अर्थचक्र दौडू शकेल. येत्या काळात निर्बंध आणखी शिथिल करण्याचे सूतोवाच टोपे यांनी केले आहे. हे पाहता पुढच्या महिनाभरात महाराष्ट्रातील वातावरण पूर्णपणे निवळेल, असे मानायला हरकत नसावी. रुग्णसंख्या घटल्याने दिल्ली व राजस्थानसारख्या राज्यांनीही निर्बंध शिथिल केलेले दिसतात. नववी ते बारावीपर्यंतचे शाळा व महाविद्यालयांचे वर्ग तसेच कोचिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केला आहे. तर नर्सरीपासून आठवीपर्यंतचे वर्ग 14 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. तर राजस्थाननेही रात्रीची संचारबंदी हटविण्यात आली आहे. साधारणपणे अनेक राज्यांमध्ये आज असेच सकारात्मक चित्र पहायला मिळते. ते पुढेही टिकविण्यासाठी उरले सरले लसीकरण वेगात कसे पूर्ण करता येईल, यावर कटाक्ष हवा. महाराष्ट्रासारख्या राज्यात पहिला डोस घेणाऱयांचे प्रमाण 92 टक्के, तर दुसरा डेस घेणाऱयांचे प्रमाण 60 टक्क्यांवर आहे. तर सध्या कोरोनाचे 95 टक्के रुग्ण गृहविलगीकरणात असून, घरीच उपचार घेत आहेत. यातून लसीकरणाचे महत्त्वच अधोरेखित होते. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर देण्याचा कार्यक्रमही गतीने राबवायला हवा. देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, कोरोनामुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. देशातील 85 टक्के लोकांचे उत्पन्न घटल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे पाहता उद्योगांचे चक्र पूर्ववत कसे होईल, हे पाहिले पाहिजे. अन्न, वस्त्र व निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात. मात्र, रोजगारच नसेल, तर या गरजा भागविल्या जाऊ शकत नाहीत. त्यातून माणूस नैराश्यात जाऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची भीती असते. मागच्या दीड ते दोन वर्षांत आत्महत्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढल्याची आकडेवारी आहे. हे ओळखून प्रत्येक हाताला काम कसे देता येईल, या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. कोरोनाने लाखमोलाची माणसे गेली. अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त झाली. तथापि, हा सगळा नकारात्मक काळ मागे टाकून आपल्याला पुढे जायचे आहे. कोरोनाची उतरती कळा सुरू झाली आहे. झेप घेण्याची हीच खरी संधी आहे. त्यामुळे सरकार, उद्योजक, नागरिक सगळय़ांनीच आपली मरगळ झटकावी. गेलेले दिवस परत येणार नसले, तरी आपल्या मेहनतीतून, दूरदृष्टीतून आपण काही प्रमाणात का होईना त्याची भरपाई करू शकतो. कोरोनाचा प्रभाव टप्प्याटप्प्याने कमी होऊन त्याचे रूपांतर अंती सर्दी पडश्यासारख्या किरकोळ आजारात होईल, असे भाकीत अनेक तज्ञांनी वर्तविलेच आहे. आजवरचा साथीच्या आजारांचा इतिहास पाहता तसे म्हणण्यास नक्कीच जागा आहे. तरीही आपण काळजी घेत कोरोनाला आणखी निष्प्रभ करुयात.
Previous Articleअनन्य भक्तांना वेद वचनांचे बंधन रहात नाही
Next Article पंजाबमध्ये भाजपला कलाकारांची साथ
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.