ऑनलाईन टीम / रांची :
कोरोना विषाणू दुसऱ्या लाटेत देशभरात अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. झारखंडमध्ये देखील भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने 6 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बुुधवारी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतत माहिती देताना मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, राज्यातील सध्याची कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन 6 मे च्या सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात मागील दिलेल्या निर्देशांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्या बाबतची माहिती लवकरच दिली जाईल. दरम्यान, सर्वांनी घरीच रहावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
दरम्यान, यापूर्वी 22 ते 29 एप्रिल या काळात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. सरकारने जारी केलेल्या या लॉकडाऊनला सुरक्षा सप्ताह असे नाव दिले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद असणार आहेत. या काळात राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरु राहणार आहेत. मात्र, या ठिकाणी भाविकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खाणकाम, शेती आणि बांधकाम करण्याससुद्धा सरकारने परवानगी दिलेली आहे. यासोबतच राज्यात कलम 144 चे पालन केले जाणार आहे.