कोरोनाचा फैलाव झपाटय़ाने सुरुच : दिवसभरात 940 नवे बाधित,428 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी / पणजी
गोव्यात कोरोनाने कहर माजवला असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी तब्बल 17 बळींची नोंद झाली आहे. दिवसभरात 940 नवे रुग्ण सापडले, तर 428 जण बरे होऊन घरी परतले आहेत. संशयित रुग्ण म्हणून 87 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 403 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. कोरोनाबाधित आणि बळी यांची संख्या सातत्याने वाढत असून सर्वसामान्य जनतेमध्ये भीती प्रकट होत आहे. 17 बळी वाढल्यामुळे एकूण बळींचा आकडा 900 वर पोहोचला आहे तर सक्रिय रुग्णांची संख्या 7540 झाली आहे.
विविध मार्गाने गोव्यात आलेल्या 27 प्रवाशांना त्या कोरोनाची लागण झाली आहे. कांदोळी, पर्वरी, मडगाव या तीन आरोग्य केंद्रांनी यापूर्वीच 500 रुग्णांचा टप्पा ओलांडला असून म्हापसा, पणजी, वास्को, फोंडा येथील आरोग्य केंद्रे त्या संख्येच्या उंबरठय़ावर आहेत.
मडगाव, कांदोळी, पर्वरीत विक्रमी रुग्ण
मडगाव आरोग्य केंद्रात सर्वाधिक म्हणजे 826 रुग्णांची विक्रमी नोंद झाली आहे. त्या खालोखाल कांदोळी आरोग्य केंद्राने 631 रुग्णांची नोंद झाली आहे तर पर्वरी आरोग्य केंद्रात 581 कोरोनाचे रुग्ण आहेत.
गेल्यावर्षापासून आतापर्यंत मिळून 68152 जणांना कोरोनाची बाधा झाली होती, त्यापैकी 59705 जण त्यातून बरे झाले आहेत.
कडक निर्बंधांची आवश्यकता
कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत असूनही सरकारने अजूनही त्यावर कोणतीच कडक अशी उपाययोजना केल्याचे दिसत नाही. मास्क घाला, सामाजिक दुरी पाळा, लस घ्या एवढेच आवाहन सरकार वारंवार करीत असून त्यापेक्षा कोणतेही निर्बंध लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गर्दी होण्याची सर्व प्रकरणे (लग्न, जत्रा, वाढदिवस) आरामात चालू असून त्यावर बंधने नाहीत आणि असली तरी त्याचे पालन होते की नाही ते पहाणारी यंत्रणा नाही, अशी परिस्थिती आहे.
विविध आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 125, सांखळी 232, पेडणे 173, वाळपई 93, म्हापसा 476, पणजी 474, हळदोणा 168, बेतकी 67, कांदोळी 631, कासारवर्णे 40, कोलवाळ 125, खोर्ली 125, चिंबल 232, शिवोली 221, पर्वरी 581, मये 59, कुडचडे 151, काणकोण 114, मडगाव 826, वास्को 480, बाळ्ळी 94, कासावली 231, चिंचणी 115, कुठ्ठाळी 414, कुडतरी 109, लोटली 131, मडकई 75, केपे 90, सांगे 70, शिरोडा 118, धारबांदोडा 73, फोंडा 454, नावेली 153.
सरकारकडून सर्व निमुटपणे पाहण्याचे काम कोरोनाचा वाढता संसर्ग पाहिल्यास परिस्थिती हाताबाहेर गेल्याची चिन्हे दर्शवत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असताना सरकार फक्त सर्व काही निमुटपणे पहाण्याचेच काम करीत आहे. गोव्यात येणाऱयांवर कोणतेही निर्बंध नाहीत. कोणाचीही चाचणी होत नाही, त्यामुळे सरकारने आता तरी जागे होऊन या कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी काहीतरी करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संवेदनशील ठिकाणांतून गोव्याला वगळा : गोव्याची महाराष्ट्र सरकारकडे मागणी
‘कोरोना उगमाची संवेदनशील ठिकाणे’ म्हणून महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या आणि गोवा राज्याचा उल्लेख असलेला आदेश मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली असून त्या आदेशातून गोव्याला वगळण्याची विनंती केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वरील मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक आदेश जारी करुन गोव्यासह केरळ, दिल्ली, गुजरात, राजस्थान, उत्तराखंड ही कोरोनाची संवेदनशील उगमस्थाने असल्याचे जाहीर केले. तेथून कोरोनाचे विविध प्रकार येऊ शकतात आणि ते महाराष्ट्रात येऊ नयेत म्हणूनच हा आदेश जारी करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. त्या आदेशानुसार वरील सहा राज्यातून महाराष्ट्रात येणाऱया सर्व प्रवाशांना 48 तासाच्या आतील आरटीपीसीआर कोरोना निगेटिव्ह चाचणी अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. तो नसल्यास त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देऊ नये, असे आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे.
डॉक्टर कोरोनाबाधित, खाटा भरल्या : आता तरी काळजी घ्यावी – आरोग्यमंत्री
राज्यात कोनाचे संकट महाभयंकर होत असतानाच सरकार आपल्यापरिने कार्य करीत आहे. गोमेकॉतील पाच डॉक्टरही कोरोनाबाधित झाले आहेत. दरदिवशी 40 ते 50 कोरोनाबाधित रुग्णांची इस्पितळात भरती केली जात आहे. हॉस्पिटलातील खाटा भरल्या आहेत. गोमेकॉतील 121 वार्ड कोविड वार्ड करण्यात आला असून ऑक्सिजन पुरवठा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात असून लोकांनी आता तरी काळजी घ्यावी, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.
काल सोमवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, यावेळी त्यांच्या सोबत गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर, आरोग्य खात्याचे संचालक जोस डिसा व अन्य उपस्थित होते.
आरोग्यसेवेतील सर्वांचे काम चांगल्या तऱहेने
लोकांनी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य सेवेतील डॉक्टर व इतर सर्व लोक चांगल्या तऱहेने काम करीत असून फोंडा हॉस्पिटलही कोरोना रुग्णांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच खाजगी इस्पितळातील किमान चाळीस खाटा कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवाव्यात, याबाबत मुख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांना वस्तुस्थितीची जाणीव नाही
लोक निष्काळजीपणा करीत असल्यानेच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. विरोधक केवळ टीका करीत असतात. वस्तुस्थिती काय आहे याची त्यांना जाणही नाही. गेल्या वर्षापेक्षा यावर्षी करोनाचे संकट महाभयंकर आहे. या संकटाच्या काळात केवळ राजकारण न करता सर्वांनी मिळून संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल, याच्यावर सूचना कराव्यात. चांगल्या सूचना नक्कीच अमलात आणू असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
कोरोनाबाधितांमध्ये युवकांची वाढती संख्या चिंताजनक : बांदेकर
कोरोनाच्या दुसऱया लाटेत गेल्यावर्षापेक्षा 34.49 टक्क्यांनी वाढ झाली असून चिंतेची बाब म्हणजे याखेपेस कोरोनाबाधितांमध्ये युववार्गची संख्या अधिक आहे, असे गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. गोव्यात सध्यास्थितीत रेमडेसीवर इन्जेक्शन पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या 660 असून आणखी 4000 येणार असल्याचे बांदेकर यांनी सांगितले. कोरोना चाचणीचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहे. दर दिवशी 5 हजारहून अधिक लोकांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणी मोबाईल व्हॅन सुरु करण्यात आली आहे. लोक सुरुवातील दुखणं अंगावर झेलतात आणि नंतर शेवटच्या क्षणी इस्पितळात धाव घेतात. त्यामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. वेळोवेळी चाचणी करून घेणे तसेच वेळोवेळी योग्य ते उपचार करून घेणे नितांत गरजेचे आहे असेही बांदेकर यांनी सांगितले.