ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधान आले आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील लोकल बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
ते म्हणाले, राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लॉकडाऊन नाही परंतु कठोर निर्बंध लागू शकतात. तसेच मुंबईतील लोकल ट्रेन बंद होणार नाही, पण प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. तसेच गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. रुग्णसंख्या वाढत असली तरी बेड कसे वाढतील याकडे लक्ष आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करा, असे आवाहन देखील विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.
नागपूरमधील कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन कमी पडले का? या प्रश्नाला उत्तर देताना, वडेट्टीवार यांनी मान्य केले की, आमचा अंदाज चुकला. नवा स्ट्रेनचा अचानक मोठ्या प्रमाणावर फैलाव होत आहे. यात 25 वर्षाखालील मुला मुलींचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे नागपूरात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी योग्य ते सर्व पाऊले सरकार उचलत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.