ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्लीत तर दिवसेंदिवस रुग्ण संख्या लक्षणीय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारने मंगळवारी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता दिल्लीत 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. रात्री 10 ते सकाळी 5 च्या दरम्यान हा कर्फ्यू असणार आहे. याची सुरुवात आज रात्रीपासून होणार आहे. दरम्यान, दिल्लीत कोरोनाची रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे. सोमवारी राज्यात संक्रमणाचा दर 5.54 % इतका होता.
या नवीन लावण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूमध्ये ट्रॅफिकवर काही निर्बंध नसणार आहेत. तसेच जे नागरिक लस टोचून घेण्यासाठी जाणार असतील त्यांना यामधून सूट देण्यात आली आहे. मात्र, संबंधित नागरिकांना ई- पास घ्यावा लागणार आहे. या सोबतच रेशन, किराणा दुकाने, फळे, भाजीपाल्याची दुकाने, मेडिकल दुकानदार यांना देखील ये – जा करण्यासाठी त्यांच्याकडे ई – पास असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियामधील कर्मचाऱ्यांना ई – पास बंधनकारक करण्यात आला आहे. तर डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफमधील कर्मचाऱ्यांना आयडी कार्ड दाखवल्यावर ये – जा करता येईल. गर्भवती महिला आणि आजारी नागरिकांना डॉक्टरांकडे जाण्यास परवानगी असणार आहे.
नाईट कर्फ्यू दरम्यान, सार्वजनिक बस, मेट्रो, रिक्षा, टॅक्सी सुरू असणार आहेत. मात्र, यामधून ज्या लोकांना नाईट कर्फ्यूमध्ये ये जा करण्यास सूट दिली आहे, तेच नागरिक प्रवास करु शकतील.