पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मोकाट फिरणाऱयांना इशारा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पर्यटनस्थळे, बाजारपेठा, हिल स्टेशन्स इत्यादी स्थानांवर मास्क न लावता प्रचंड गर्दी करणाऱयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इशारा दिला आहे. ‘आपली इच्छा असेल तर कोरोनाचा तिसरा उद्रेक निश्चितपणे होऊ शकतो,’ अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी अशा मोकाट आणि बेजबाबदार लोकांना फटकारले आहे.
त्यांनी मंगळवारी ईशान्य भारतातील आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश तसेच सिक्कीम या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. त्यांनी या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. गेल्या दोन आठवडय़ांपासून पुन्हा या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
या राज्यांमध्ये अनेक पर्यटन स्थळे व हिल स्टेशन्स आहेत. अनेक राज्यांनी आता लॉकडाऊन उठविल्याने या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली आहे. पर्यटनाचा आनंद लुटताना लोकांकडून कोरोनाच्या नियमांची सरसकट पायमल्ली होत आहे. असंख्य पर्यटक मास्कही न लावता गर्दीत मिसळत आहेत. यामुळे आटोक्यात येत असलेला कोरोना पुन्हा उफाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाजारपेठा गजबजल्या
देशभरात बहुतेक राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे किंवा संपविण्यात आला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये लोकांनी प्रचंड गर्दी करण्यास प्रारंभ केला आहे. जणू काही कोरोना संपलाच आहे, अशी लोकांची वर्तणूक आहे. यामुळे कोरोनाचा पुन्हा झपाटय़ाने प्रसार होण्यास अनुकूलता निर्माण होत आहे.
तिसऱया उदेकाला प्रतिबंध शक्य
लोकांनी कोरोना नियमावलीचे व्यवस्थित पालन केल्यास लॉकडाऊन उठल्यानंतरही कोरोनाला प्रतिबंध केला जाऊऊ शकतो. मास्कचा शास्त्रशुद्ध उपयोग आणि सामाजिक अंतर या दोन नियमांचे पालन करणे तर अत्यावश्यकच आहे. तितके केले तरी तिसरा उद्रेक थोपविला जाऊ शकतो, हे सर्व राज्य सरकारांच्या विभागांनी लोकांना पटवून द्यावे. लोकांनीही या बाबी समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत कोरोनाच्या नियमांशी तडजोड करू नये. तसे केल्यास देशासमोर तिसऱया उद्रेकाचा गंभीर धोका आहे, असा इशारा त्यांनी दिला.
24 तासांमध्ये रुग्णांचा नीचांक
सोमवार ते मंगळवार या चोवीस तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 31,443 नवे रुग्ण आढळले आहेत. हा गेल्या 118 दिवसांमधील नीचांक आहे. तर याच कालावधीत 48,916 रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 4,31,315 वर आली आहे. पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 1.4 टक्के इतके खाली आले. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्याही आता 3 कोटी 9 हजारांवर पोहचली आहे. मात्र, याच चोवीस तासांमध्ये मृतांची संख्या मात्र वाढल्याचे दिसून येते. मध्यप्रदेश आणि इतर काही राज्यांनी पूर्वी मृत झालेल्यांची संख्या यात जोडल्याने ही संख्या वाढल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
सप्टेंबरपासून सिरममध्ये स्पुटनिकचे उत्पादन
रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादक असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिटय़ुटने सप्टेंबरपासून सिरममध्येच स्पुटनिक व्ही लसीचे उत्पादन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मंदावलेला लसीकरणाचा वेग पुढच्या टप्प्यात वाढण्याची चिन्हे आहेत. गत महिन्याभरापासून भारतात व्यापक प्रमाणावर लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांनादेखील लसीकरण करण्यासंदर्भात घोषणा केल्यानंतर त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली. मात्र, लसींचा पुरवठा अपुरा पडू लागला. भारतात सध्या कोव्हिशिल्ड आणि कोवॅक्सिन यासोबतच स्पुटनिक व्ही आणि मॉडर्ना या लसींनादेखील मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच त्यांचा मोठय़ा प्रमाणावर पुरवठा होण्याची शक्मयता आहे. भारतात वर्षाला स्पुटनिक व्ही लसीचे 30 कोटी डोस तयार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासंदर्भात रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडचे सीईओ कायरिल दिमित्रिएव्ह एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले, सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया सप्टेंबरमध्ये स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाला सुरुवात करणार आहे. काही इतर भारतीय उत्पादक देखील उत्पादनासाठी तयार आहे.
लसीकरण 40 कोटीकडे
आतापर्यंत देशात किमान लसीचा एक डोस दिलेल्यांची संख्या 39 कोटी 46 लाख इतकी झाली आहे. राज्यांकडे तसेच खासगी लसीकरण केंद्रांकडे अद्यापही 1 कोटी 91 लाख 55 हजार 630 लसी शिल्लक आहेत. आणखी 12 लाख लसी येत्या चोवीस तासांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. देशातील 108 कोटी सज्ञान (प्रौढ) लोकांचे लसीकरण डिसेंबर अखेरपर्यंत करण्याचे ध्येय आहे.
प्रथम कोरोना रुग्णाला पुन्हा कोरोना
भारतात कोरोनाची प्रथम रुग्ण केरळमध्ये गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीत सापडली होती. ती त्यावेळी 20 वर्षांची विद्यार्थिनी असून चीनच्या वुहान येथील मेडिकल कॉलेजात शिकत होती. तिला पुन्हा कोरोना झाल्याचे मंगळवारी आढळले आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. नियमानुसार तिचे नाव प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. तथापि, एकदा कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचेही दिसून आले आहे. तज्ञांनीही त्याला दुजोरा दिला असून एकदा कोरोनातून बरे झालेल्या लोकांना तीव्र स्वरुपाचा कोरोना होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे संशोधनाअंती दिसून आल्याचे सांगितले जाते.