ऑनलाईन टीम / कोलंबो :
भारतात कोरोना विषाणू अक्षरशः थैमान घालत आहे. मागील 24 तासात तब्बल 2.14 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशात विदारक स्थिती निर्माण झाली आहे. भारतात वाढत असलेल्या कोरोना संकटाचा इतर देशांनी देखील धसका घेतला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्या नागरिकांना बंदी घातली आहे. त्यानंतर आता श्रीलंकेने देखील भारतीय प्रवाशांना आपल्या देशात येण्यावर निर्बंध घातले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाचे रुग्ण आपल्या देशात वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील प्रवशांना श्रीलंकेत उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही असे श्रीलंकन नागरी उड्डयन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे श्रीलंकेच्या पर्यटनाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे श्रीलंका आता पर्यटकांसाठी श्रीलंकेची दारे खुली करण्याच्या विचारात आहे. मात्र भारतातील स्थिती पाहून श्रीलंकन सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत भारतातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जातात. मात्र, आता भारतीय प्रवाशांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.
श्रीलंकेतही कोरोनाने आपले पाय रोवायला सुरुवात केली आहे. मागील 24 तासात 1939 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत श्रीलंकेत कोरोनामुळे 734 जणांनी आपला जीव गमावला आहे.