भारत सध्यातरी सावरलेला वाटत आहे पण कोरोनाची साथ कधी संपणारच नाही का अशा प्रकारची भीती सर्वदूर पसरली आहे. ती किती बरोबर अथवा चूक ते काळच दाखवेल. पण समाजातील तळागाळातील माणसापासून टाटा बिर्लामध्येदेखील ही भीती घर करून बसली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या देशव्यापी टाळेबंदीचे सूतोवाच केले असताना कापूसकोंडय़ाच्या गोष्टीप्रमाणे कोरोनाची साथ कधी संपणारच नाही का अशा प्रकारची भीती सर्वदूर पसरली आहे. ती किती बरोबर अथवा चूक ते काळच दाखवेल. पण समाजातील तळागाळातील माणसापासून टाटा बिर्लामध्येदेखील ही भीती घर करून बसली आहे.
50 दिवसांच्या लॉकडाऊननंतर या भयानक विषाणूचा प्रसार कमी व्हायला हवा होता पण तसे घडलेले दिसत नाही. दोन महिन्यापूर्वी 100 च्या सुमारास असलेली रुग्णसंख्या आता लाखाच्या जवळपास जाऊ पाहत आहे, याचा अर्थ कडकडीत टाळेबंदी अपयशी ठरली आहे असा नव्हे. कारण युरोप, अमेरिकेप्रमाणे आपल्याकडे मृत्यूसंख्या वाढलेली नाही. आता फक्त जीव वाचवायचे की जीवनाला अर्थपूर्णता देणारी अर्थव्यवस्थादेखील वाचवायची या कात्रीत सापडलेल्या पंतप्रधानांनी ‘जान भी जहान भी’ असे प्रतिपादन करून दोघे एकमेकाला पूरक आहेत असाच संदेश दिलेला आहे. परिस्थितीचा रट्टाच असा आहे की आता सामान्य माणूस जास्तच हतबल झालेला आहे. राजधानी दिल्लीत त्याचे प्रतिबिंब दिसत आहे. अधिकृतपणे अजून टाळेबंदीत ढिलाई झालेली नसली तरी शहरातील बाजार हळूहळू उघडू लागले आहेत. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असे आता लहानमोठे व्यापारी तसेच हातगाडीवर भाजीपाला आणि फळे विकणारे म्हणू लागले आहेत. ‘आमचा कारभार नेहमी बंद ठेवला तर मग आम्ही काय खायचे’ असा युक्तिवाद वारंवार ऐकायला मिळत आहे. बाजार हळूहळू उघडत असताना अचानक भिकाऱयांची संख्यादेखील वाढलेली दिसत आहे. हातावर पोट असलेले सायकल रिक्षावालेदेखील आशाळभूत
नजरेने गिऱहाईकांची वाट बघताना आढळत आहेत. अजून ऑटोरिक्षा आणि बॅटरी चलित वाहने रस्त्यावर उतरली नसल्याने सायकल रिक्षावाल्याना थोडासा धंदा मिळत आहे. राजधानीच्या मुस्लिमबहुल पुरानी दिल्ली भागात देखील लोक 50 दिवसांच्या लॉक डाउनने थकून गेलेले दिसले. रमझानचा महिना सुरू असताना पहिल्यांदाच अशा प्रकारची बंदी पाळली जात आहे. पण या भागातील जनजीवन देखील हळूहळू पूर्ववत होण्याच्या मार्गाला लागले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एकेकाळचे पंतप्रधानांचे कट्टर विरोधक, पण आता एकप्रकारे मोदीभक्त बनत चालले आहेत असे अजब चित्रदेखील अलीकडील काळात बघायला मिळत आहे. मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर नुकत्याच केलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. मोदींनी घेतलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या निर्णयाने कोरोनाविरुद्धच्या लढाईत फार मदत झाली असे सांगितले. वर्षभरापूर्वी मोदी परत सत्तेवर आल्यापासून केजरीवाल यांचा सूर मवाळ बनत चालला होता. चार-पाच महिन्यापूर्वी ते परत मुख्यमंत्री झाल्यापासून मोदींबरोबर जुळवून घेणेच राजकीय दृष्टय़ा सुज्ञपणाचे आहे असे त्यांना वाटत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या पाच-सहा वर्षात केजरीवाल यांनी खडय़ासारखे बाजूला सारलेले त्यांचे एकेकाळचे घनिष्ट साथी कुमार विश्वास यांनी देशातील स्थलांतरितांच्या प्रश्नाकरता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर शरसंधान सुरू केले आहे. हा प्रश्न पहिल्यांदा दिल्लीमध्ये सुरू झाला तेव्हाच नीट हाताळला असता तर आजची स्थिती आली नसती, असे आजकाल भाजपच्या जवळ गेलेले कुमार विश्वास म्हणत आहेत.
येत्या काळात कोरोनाबरोबर राहायला शिकले पाहिजे या निष्कर्षाप्रत मोदींप्रमाणे केजरीवालदेखील आले असल्याने राजधानीतील टाळेबंदी सैल करण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लकडा त्यांनी केंद्रापाशी लावला आहे. गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशी आपली स्थिती होऊ नये याची त्यांना भीती आहे. दिल्लीतील अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाल्याने राज्य सरकारचा महसूल एकदम कमी झाला आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले असले तरी त्याचा लाभ कितपत होणार ते समजायला एक वर्ष लागेल. कोरोना संक्रमणाच्या या काळात या विषाणूचा सध्याचा जोर कमी झाल्यावर परत दुसरी आणि यापेक्षा जोराची कोरोनाची साथ येणार काय याबाबत सरकार, विरोधी पक्ष आणि उद्योग जगत संभ्रमित झालेले आहे. कोणाला पुढे काय होणार याचा फारसा पत्ता नाही. ‘एक हत्ती आणि सहा आंधळे’ गोष्टीप्रमाणे प्रत्येकजण आपले आकलन खरे मानत आहे. जर संक्रमणाचा सध्याचा वेग थांबला नाही तर येत्या वर्षभरात देशात 10 लाख रुग्ण होतील असे काहीजण सांगतात. तामिळनाडूने कालच राज्यातील टाळेबंदी 31 मे पर्यंत वाढवलेली आहे.
भारत सध्यातरी सावरलेला वाटत आहे. बलाढय़ अमेरिकेला या विषाणूने पुरते बेजार केले आहे. तिथे 15 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे आणि त्यापैकी जवळजवळ 90,000 जणांचा मृत्यू ओढवला आहे. या वर्षअखेर अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जात असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या पराभवाची भीती वाटू लागली आहे. तिथे त्यांचे प्रतिस्पर्धी आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा पाठिंबा बळावत आहे. याला कारण की कोरोनाच्या साथीबाबत ट्रम्प यांनी काही काळ केवळ दुर्लक्षच केले असे नाही पण या विषाणूबाबतच्या संभाव्य संकटाची टर उडवली. ट्रम्प यांनी आपली मतपेढी सुरक्षित राखण्यासाठी कोरोनाच्या साथीकरता चीनला जबाबदार धरून त्यावर दिवसरात्र शाब्दिक हल्ले वाढवले आहेत.
गेल्या 16 मे ला मोदी पंतप्रधान बनून सहा वर्षे झाली हा सत्ताधारी वर्गाकरता मोठाच मोलाचा क्षण होता. कोरोनाची काळी छाया पडल्याने तो दिवस कसा आला आणि गेला ते फारसे कळले नाही. साऱया जगाप्रमाणे भारत देखील चातकाप्रमाणे या विषाणूचा अटकाव करण्यासाठी एका लसीची वाट बघत आहे. ही लस विकसित करण्यास एक वर्ष लागणार असे सांगितले जात आहे. देशातील शास्त्रीय संशोधन करणाऱया संस्थांनी या कामी फारशी भरीव कामगिरी केलेली आहे असे अजूनपर्यंत दिसलेले नाही.
सुनील गाताडे