परिस्थिती गंभीर असून प्रशासनाच्याही हाताबाहेर गेली आहे. त्यातच गृहविलगीकरणातील रुग्ण नियम पायदळी तुडवत सर्वत्र फिरत असल्याने ते कोरोना प्रेडर ठरत असून संसर्ग अधिक वाढताना दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱया लाटेत कोकण अधिक कोलमडून पडला आहे. बाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर चिंतेत भर टाकत आहे. एकटय़ा रत्नागिरीचाच मृत्यूदर हा पुन्हा एकदा 2.99 पर्यंत पोचला आहे. परिणामी निर्माण झालेली कोविड सेंटरही कमी पडू लागली असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी नातेवाईकाना रुग्णालयाच्या दारोदारी भटकावे लागत असल्याने त्यामध्येही अनेकांची जीव जात आहेत. एकूणच परिस्थिती गंभीर असून प्रशासनाच्याही हाताबाहेर गेली आहे. त्यातच गृहविलगीकरणातील रुग्ण नियम पायदळी तुडवत सर्वत्र फिरत असल्याने ते कोरोना प्रेडर ठरत असून संसर्ग अधिक वाढताना दिसत आहे.
गतवर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेचा तडाखा बसल्यानंतर त्यातून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनता यापैकी कुणीही कोणताही धडा न घेतल्याने सध्याची परिस्थिती ओढवली आहे. गेल्यावेळी ही महामारी शहराबरोबरच ग्रामीण भागानेही फार गंभीरपणे घेतली. अगदी गावच्या सीमा बंद करून वाटेवर खडा पहारा देण्यापर्यंत जागरूकता दाखवली. गावागावातून ग्रामकृती दल स्थापन करून कोरानाला वेशीच्या बाहेरच थांबवण्यात यशस्वी झाले. प्रशासनानेही कठोर भूमिका घेत एखादा रुग्ण सापडल्यानंतर ज्या पद्धतीने पुढची परिस्थिती हाताळली ती वाखाणण्याजोगी होती. त्यामुळे पहिल्या लाटेचा तडाखा कमी बसला. मात्र सुरू झालेल्या दुसऱया लाटेत अवघ्या दीड, दोन म†िहन्यातच होत्याचे नव्हते होत चालले आहे.
गेल्या दीड महिन्यात गावेच्या गावे, वाडय़ाच्या वाडय़ा कोरोनाची हॉटस्पॉट बनत चालली आहेत. पहिल्या लाटेत प्रशासन, ग्रामकृती दल आणि ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने काम केले, काळजी घेतली ती यावेळी मात्र कुठेच घेतलेली दिसली नाही. प्रशासनाने ग्रामकृती दलाना ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केला असला तरी ती आजपर्यंत तरी कार्यरत झालेली नाहीत. ग्रामस्थांनीही पुरेशी जागरूकता दाखवली नाही. बेफिकीर रुग्ण आणि ग्रामस्थांमुळे पुढे प्रशासनही तेवढे गंभीर झालेले नाही. गेल्यावेळी मुंबई, पुणेकराना गावात येण्यासाठी फार विचार करायला लागायचा, मात्र आता कधी येतात आणि निघून जातात कोणालाच कळत नाही.
रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एप्रिल महिन्यापासून रुग्णसंख्या खोऱयाने वाढली. दिवसाला पाचशे ते सहाशेपर्यंत सरासरी रुग्णांची नोंद होत गेली. दोन्ही जिह्यात सध्या पाच हजाराच्या पुढे ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. तर मृत्यूदरही पुन्हा वाढतच आहे. रत्नागिरी जिह्यात तर दिवसाला सरासरी 15 ते 20 दरम्यान मृत्यू होत आहेत. आतापर्यंत या जिह्यात कोरोना बळींची संख्या 815 इतकी झाली आहे. तर सिंधुदुर्गात 408 इतकी आहे. तेथे महिनाभरातच अडीचशे मृत्यू झाले आहेत. ही आकडेवारी शासकीय आहे. त्याशिवाय टेन्शन, उपचारादरम्यान आणि उपचार न मिळालेले यांच्या मृत्यूंची मोजदाद नाही. एकेका घरातील कुटुंबच्या कुटुंबे मृत्यूला सामोरे गेलेली आहेत. रत्नागिरीचा मृत्यूदर हा 2.99 पर्यंत पोहोचला आहे.
मुळातच ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे, मात्र कोणतीही लक्षणे नाहीत अशांनीच गृह विलगीकरणात रहायचे आहे. मात्र गृह विलगीकरणाबाबत चुकीचा गैरसमज पसरवला गेला आहे. सध्यस्थितीत लक्षणे असलेले अनेक रुग्ण हे घरीच राहात आहेत. घरात राहिलेल्या रुग्णांनी कोरोना नियमांना हरताळ फासल्याने कुटुंबच्या कुटुंबे बाधित झाली. शेतीची कामे, आंबा काढणी, बागायतीची साफसफाई सुरू झाली. त्यातूनच मग एकमेकांच्या संपर्कातून परिसर आणि गावात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. त्यामध्येच शिमगोत्सवासह धार्मिक कार्यक्रम, लग्न सोहळे आणि इतर कार्यक्रमातील सहभागामुळे कोरोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात झपाटय़ाने वाढली.
मुळातच शिमगोत्सवानंतरच रुग्णसंख्या वाढायला सुरुवात झाली. प्रारंभी उपचार व्यवस्थित मिळत होते. मात्र जिह्यात ज्यावेळी दिवसाला रुग्णसंख्या पाचशेच्या पुढे सरकायला लागली तसतशी कोविड सेंटर फुल्ल व्हायला लागली. पुढे टेस्ट पॉझिटिव्ह म्हणून आणि बेड मिळत नाही म्हणून टेन्शन अशा कात्रीत रुग्ण आणि त्याचे नातेवाईक आले. उपचारासाठी बेड मिळत नसल्याने मग रुग्णाला गृह विलगीकरणाशिवाय पर्यायच उरला नाही. परिस्थितीही प्रशासनाच्या हाताबाहेर गेली. आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची परिस्थिती पाहिली तर 70 टक्केहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामागे शासकीय विलगीकरण कक्षात पुरेशा सोयीसुविधा नसल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र त्यामुळे परिस्थिती मात्र अधिक बिघडत चालली आहे.
मुळातच गृहविलगीकरणातील कोरोना प्रेडर जसे कोरोना प्रसारासाठी कारणीभूत ठरले तसेच आरटीपीसीआर अहवालास लागणारा विलंबही तितकाच कारणीभूत ठरला. स्वॅब घेतल्यानंतर आठवडाभर अहवाल येत नसल्याने गोंधळ उडत होता. दोन्ही जिह्यात आरटीपीसीआर करणाऱया दोन लॅब आहेत. आता लॅब वाढवल्या जात आहेत. ऍन्टीजेन टेस्टही सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरू आहेत. त्याचबरोबर घरोघरी जाऊन आरोग्य कर्मचारी सर्वेक्षण करत आहेत. अशा सर्वातून वाढती रुग्णसंख्या पुढे येत आहे. मात्र दररोजची संख्या आणि उपलब्ध आरोग्य सुविधा तपासल्या तर त्यांच्या उपचाराचे काय असा प्रश्न पुढे येतो.
आज शासकीय जिल्हा, उपजिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सुविधाही मिळत आहे. मात्र त्याची रुग्णसंख्येची क्षमता फारच कमी आहे. त्यामुळे जागोजागी पेड कोविड सेंटर उभी राहिली आहेत. मात्र तेथील उपचार खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. आमदारांना 1 कोटीचा निधी कोविडसाठी खर्च करण्यास सांगितले आहे. अनेक आमदारांनी आपला निधी शासकीय रुग्णालयात साहित्य खरेदीवर खर्च केला आहे. कोकणात रुग्णसंख्या वाढत असताना एकाही आमदाराला कोविड सेंटर सुरू करावेसे वाटलेले नाही. अनेक आमदार घरातून बाहेर पडत मतदारसंघात फिरतानाही दिसत नाहीत.
राजेंद्र शिंदे