चक्रीवादळच्या धक्क्यातून सावरेना गोवा : विजेअभावी राज्यभर समस्याच समस्या,तांडवानंतरच्या दुष्परिणामांची मालिका सुरुच
प्रतिनिधी / पणजी
शनिवार, रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या धक्क्यातून गोवा अद्याप सावरलेला नाही. गोव्यातील चक्रीवादळ थंडावले असले तरी त्याच्या जबर तडाख्याचे दुष्परिणाम गोमंतकीय जनतेला भोगावे लागत असून लोकांचे गेल्या दोन दिवसांपासून हाल सुरू आहेत. कोरोनाचा संसर्ग चालू असतानाच वीज नाही, त्यामुळे पाणी नाही, मोबाईलचे नेटवर्क नाही अशा विविध संकटात जनता सापडली आहे. राजधानी पणजी वगळता इतर बहुतेक शहरात आणि प्रमुख्याने सर्व ग्रामीण भागात गेल्या दोन रात्री विजेचे दिवे पेटलेले नाहीत. त्यामुळे ग्रामीण, शहरी भाग दोन रात्री काळोख्यात राहिला.
अगोदर काळजी घेऊनही या चक्रीवादळामुळे गोव्याची मोठय़ा प्रमाणात नुकसानी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करुन सर्व ते सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे.
चक्रीवादळाने करुन दिली विजेच्या महत्वाची जाणीव
चक्रीवादळाचा मुख्य तडाखा वीज पुरवठय़ाला बसला. संपूर्ण राज्यात वीज नसल्याने अनेकांचे मोबाईल चार्जिंगविना पडले आहेत. परिणामी संपर्क साधणेही मुश्कील झाले असून इंटरनेट सेवा देखील कोलमडल्याने जनतेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अनेकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असून वीज नसल्याने पंपद्वारे पाणी खेचणे अशक्य बनले आहे. त्याचा फटका जलप्रकल्पांना तसेच पाणीपुरवठा करणाऱया टँकर्सनाही बसला. एकंदरीत संपूर्ण जनजीवनात आणीबाणी निर्माण झाली असून सर्व सुरळीत होण्याची लोक वाट पहात आहेत. आपल्या दैनंदिन जीवनात विजेचे महत्त्व किती मोठे आहे, याची जाणीव या वादळाने गोमंतकीयांना करून दिली आहे.
राज्यभरात युद्धपातळी सुरु आहेत विजेची दुरुस्तीकामे
शनिवारी रात्रीपासूनफ रविवारी रात्री उशिरापर्यंत वादळी वारे, मुसळधार पाऊस चालू राहिल्याने दुरूस्तीकामे वेगाने होऊ शकली नाहीत. सोमवारी सकाळनंतर वादळ शांत होऊन पावसाने उसंत घेल्याने अग्निशामक दल, वीजखात्याने बचावकामे युद्धपातळीवर सुरू केले आहे. अनेक रस्ते झाडे पडल्यामुळे अजुनही बंद असून पूर्णपणे खुले झालेले नाहीत तर अनेक रस्ते अग्निशामक जवानांनी पडलेली झाडे कापून खुले केले. घरांवर, रस्त्यांवर पडलेली झाडे काढण्याचे काम अनेक भागात सुरू आहे.
नुकसानीचा अंदाज बांधणे अद्याप बनले अवघड
विजेचे खांब, वीजवाहिन्या व त्यांचे फिडर हे सर्व पुर्ववत करण्याचे काम वीज खात्याने युद्धपातळीवर हाती घेतले आहे. परंतु ते कधी पूर्ण होईल आणि कोणत्या भागातील गुल झालेली वीज कधी येईल हे सांगता येणार नाही. चक्रीवादळाच्या धक्याने ग्रामीण भागातील जननेचे हाल होत असून गोव्यातील एकंदरीत मालमत्तेच्या नुकसानीचा अंदाज काढणे अद्यापही शक्य झालेले नाही. चक्रीवादळाच्या खाणा, खुणा अजुनही राज्यातील विविध भागात दिसत असून वीज, पाण्याविना लोक कसेतरी दिवस ढकलत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वीज नसल्यामुळे व पाणी न मिळाल्याने प्रत्येक घरातील गृहिणींना त्याचा मोठा फटका बसला असून विजेची उपकरणे (मिक्सर व इतर) चालत नसल्याने स्वयंपाक व इतर कामे करणेही अवघड झाले आहे. वीज नसल्याने बंद पडलेल्या रेफ्रिजरेटर मधील जीवनावश्यक वस्तू, पदार्थ सडून गेले आहेत. या चक्रीवादळाचा एकंदरीत जनजीवनावर मोठा परिणाम झाला असून जनता कंटाळून गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
पंतप्रधानांकडून गोव्यातील चक्रीवादळाचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंदीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून चक्रीवादळाच्या गोव्यात झालेल्या हानीचा आढावा घेतला आणि केंद्र सरकारतर्फे संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. डॉ. सावंत यांनीच वरील माहिती देऊन सांगितले की राज्यातील नुकसानीचा आढावा घेतला जात असून त्याचा तपशील केंद्राला देण्यात येणार आहे. गोव्यातील केंद्र सरकारची सर्व खाती, एजन्सी, कार्यालये राज्य सरकारला वादळाने विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी सहभागी होतील, असे आश्वासन देण्यात आले आहे.
राज्याला 1994 सालीही दिला होता वादळाने तडाखा
शनिवार-रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळापुर्वी 1994 साली झालेल्या वादळाने गोव्याला मोठा तडाखा दिला होता. त्यामुळे बारा लोकांचे बळी गेले आणि बरीच मोठी नुकसानी झाली होती. ते वादळ दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान सुरु होऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत शमले होते. त्यावेळेलाही वीज यंत्रणेचे मोठे नुकसान झाले होते. मात्र युद्धपातळीवर काम करुन वादळ शमल्या नंतरच्या अवघ्या चोवीस तासांच्या आत वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आले होते. त्यावेळी तशा आजच्या सारख्या आधुनिक सुविधा नव्हत्या. या तौक्ते वादळात रविवारी दोघा माणसांचे बळी गेले तर रविवारी जखमी झालेल्या तिसऱया व्यक्तीचा सोमवारी बळी गेला. त्यामुळे काल सोमवापर्यंत तीन बळी गेल्याची नोंद झाली आहे.
चक्रीवादळामुळे शहर बसस्थानकाचे पत्रे उडून गेले असून काही पत्रे तेथेच उभ्या असलेल्या बसगाडय़ांवर असे स्थिरावले, तर काही पत्रे शंभर मीटर अंतरावरील बाबासाहेब आंबेडकर उद्यानापर्यंत जाऊन पडले.