सप्टेंबरमध्ये ‘आर-व्हॅल्यू’ 0.92 टक्क्यांवर- देशात रुग्णसंख्या नियंत्रणात
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाचे संक्रमण वाढीचा वेग हळूहळू कमी होत आहे. कोरोना संक्रमणाचा वेग दर्शवणारा ‘आर-व्हॅल्यू’ सप्टेंबर महिन्यात कमी होऊन 0.92 झाला आहे. यापूर्वीच्या ऑगस्ट महिन्यात हा आकडा एकच्या वर गेला होता. देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण अद्यापही सापडत असल्यामुळे मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरमध्ये ‘आर-व्हॅल्यू’ एकपेक्षा अधिक आहे. मात्र, राजधानी नवी दिल्ली आणि महाराष्ट्रातील सर्वात पहिला रुग्ण सापडलेल्या पुण्यात ही ‘आर-व्हॅल्यू’ एकपेक्षा कमी असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.
‘आर व्हॅल्यू’ म्हणजे कोरोना व्हायरसचे संक्रमण किती वेगाने पसरते याचे मापक आहे. ‘रिप्रोडक्शन नंबर’ असे त्याला संबोधले जाते. हा नंबर एका संक्रमित व्यक्तीकडून सरासरी किती लोक संक्रमित करतो हे निश्चित करतो. आर-व्हॅल्यू जर सतत कमी होत असेल तर कोविडचा कहर हळूहळू कमी होत असल्याचे स्पष्ट आहे. जर ही व्हॅल्यू सतत कमी होत गेली तर आपण लवकरच कोरोनावर नियंत्रण मिळवू शकू असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे. जगभरात तिसऱया लाटेची भीती व्यक्त केली जात असताना देशासाठी मात्र दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या केरळ आणि महाराष्ट्रातील सप्टेंबरमधील संसर्गस्थिती नियंत्रणात असल्याचे चेन्नईच्या गणित विज्ञान संस्थेचे अधिकारी सीताभ्र सिन्हा यांनी म्हटले आहे.
दिवसभरात 26,964 नवे रुग्ण, 383 मृत्यू
देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकडेवारीत चढ-उतार अद्याप कायम आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये मंगळवारी दिवसभरात 26 हजार 964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 383 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याचदरम्यान देशात दिवसभरात 34 हजार 167 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
देशात आतापर्यंत 3 कोटी 35 लाख 31 हजार 498 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 45 हजार 768 जणांचा मृत्यू झाला असून 3 कोटी 27 लाख 83 हजार 741 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात अद्यापही 3 लाख 1 हजार 989 इतके रुग्ण उपचाराधीन आहेत.
केरळमध्ये मंगळवारी 15 हजार 768 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 214 जणांचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 1 लाख 61 हजार 195 एवढी आहे. याचदरम्यान महाराष्ट्रात मंगळवारी दिवसभरात 3 हजार 131 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 021 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.