मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा अंदाज , राज्यातील सर्व व्यवहारांना अनुमती
प्रतिनिधी/ पणजी
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अनलॉक 5.0 मार्गदर्शक तत्वानुसार गोवा राज्यातील सर्व व्यवहार सुरू करण्यास अनुमती देण्यात आली असून संबंधीतांवरच आता त्याची जबाबदारी आहे. कोरोनाचा गोव्यातील संसर्ग आता कमी होत असून आणखी 3 ते 4 महिने त्यासोबत काढावे लागतील नंतर तो संपेल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, अनलॉक 5.0 नुसार सर्व गोष्टी सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. उद्योग, व्यवहार सुरू केल्याशिवाय फायदा तरी कसा होणार? कोरोनाचा बाऊ करण्यात आता अर्थ नाही. त्यातून बाहेर पडून आता सर्व गोष्टी सुरू करण्याची गरज आहे. ती आता सर्वांचीच जबाबदारी आहे. गोव्यातील 80 टक्के हॉटेल्स हाऊसफुल्ल होत असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केला. कोणतीही गोष्ट सरकारने अडवलेली नाही. सर्व एसओपी पाळून सर्व व्यवहार आता करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी नमूद केले.
शाळांबाबत सल्लामसलत सुरु
शाळा चालू करण्यासंदर्भात शिक्षण खाते, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक संघटनांशी सल्लामसलत सुरु आहे. त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो आला की त्याबाबतही निश्चित काहीतरी ठरवता येईल.
केंद्राच्या मान्यतेनंतर चार्टर विमाने सुरु होणार
गोव्यातील चार्टर विमानांबाबत विचारता ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्रालयाने अद्याप त्यास मान्यता दिलेली नाही. त्याची मान्यता मिळताच गोव्यात येणारी चार्टर विमाने सुरु करणे शक्य होईल, असे निवेदन त्यांनी केले.
सर्वांनी आपापले व्यवसाय नियमितपणे सुरू करण्याची गरज आहे. ते जोपर्यंत सुरू होत नाहीत तोपर्यंत काहीच होणार नाही आणि नुकसान सोसावे लागणार हे प्रत्येकाने आता ओळखावे. आता सर्व व्यवहार अनलॉक झाले असून मार्गदर्शक तत्वानुसार काळजी घेऊन ते चालवणे सर्वांच्याच हिताचे आहे, असे ते म्हणाले.