मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांची टीका
कोरोनाचे रुग्ण वाढत असूनही उपाययोजना नसल्याने नाराजी
प्रतिनिधी / मालवण:
कोरोनाची साथ सुरू होऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी उलटला आणि पुढे किती कालावधी जाईल हेही सांगणं मुश्किल असताना शहरासाठी भविष्याचे नियोजन कुठे आहे? शहरात सातत्याने जंतुनाशक फवारणी करणे गरजेचे होते. शहरामध्ये पन्नास बेडचे नगरपालिकेचे स्वत:चे कोविड केअर सेंटर होणे गरजेचे होते. शहरातील नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी औषध वाटप होणे गरजेचे होते. मात्र, याकडे मुख्याधिकाऱयांना लक्ष देण्यास वेळच नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता आमच्या संयमाचा अंत होत आला आहे, असा इशारा उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी दिला.
वराडकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शहरात मुख्याधिकारी स्वत:चे राज्य असल्यागत वागत आहेत. सध्या कोविडने थैमान घातले असताना व शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढत असताना मुख्याधिकारी हे सिंघम स्टाईलने फक्त दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात धन्यता मानता आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अगर नियंत्रण आणण्यासाठी अत्यावश्यक तपासण्या अगर आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याधिकारी यांच्याकडून हालचाली होताना दिसत नाहीत, अशीही टीका वराडकर यांनी केली.
शहरवासियांसाठी सुविधा उपलब्ध करा
शहरात मोकाट कुत्रे, गुरांचा त्रास जनतेला होत आहे. शहरातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना पालिकेतर्फे कोविड सेंटर उभारणी करण्याबाबत कधीही लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्याचे सौजन्य मुख्याधिकाऱयांनी दाखविलेले नाही. कोविड तपासणी केंद्र उभारणीचे टेंडर काढण्यात आले. अल्पबचत इमारतीवर खर्च करण्यात आला मात्र अद्याप हे केंद्र सुरू करण्याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. मुख्याधिकारी छोटय़ा-छोटय़ा दंडात्मक कारवाई अगर दारुडय़ांना पकडण्यासाठी फ्रिस्टाईल पळापळ असे प्रकार करत आहेत. मटकेवाल्यांवर छापा घालण्यात आनंद घेत आहेत मात्र शहरवासियांना सुविधा देण्यासाठी कोणताही ऍक्शन प्लॅन आखलेला नाही. यामुळे मुख्याधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत, की नुसती स्टंटबाजी हे कळणे कठीण होत आहे. शहरवासियांना अभिपेत असलेले काम करण्यासाठी मुख्याधिकाऱयांना संधी असतानाही ते फक्त आदेश बजावणीत गुंतलेले आहेत, अशीही नाराजी वराडकर यांनी व्यक्त केली आहे.
कंत्राटी कामगारांचा जीव धोक्यात!
पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकारही पालिकेत होत आहे. कंत्राटी कामगारांचे विमे उतरविलेले नसतानाही त्यांना कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येत आहे, त्यांच्यासाठी पीपीई किट उपलब्ध करून न देता त्यांना थेट बाधित क्षेत्रात नेण्यात येत आहे. भविष्यात या कामगारांच्या जीवितास अगर कुटुंबियांना धोका पोहोचल्यास याला सर्वस्वी मुख्याधिकारी जबाबदार राहतील, असाही इशारा वराडकर यांनी दिला आहे.