ऑनलाईन टीम / नवी मुंबई
देशातील अनेक राज्यात वाढणारी ओमिक्रॉनची संख्या आता चिंतेचा विषय बनत आहे. कारण ओमिक्रॉनचा बहुतांश राज्यांमध्ये प्रसार झाला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागु करण्याच्या विचारात अनेक राज्ये असून वाढीचा वेग मंदावला नसल्यास निर्बंध लागु करणे अटळ असल्याचे ही अनेक राजकिय नेत्यांनी स्पष्ट ही केले आहे. कोरोनाची तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
याबाबत भाष्य करताना कोरोनाची तिसरी लाट आल्यास त्याला भाजपाच जबाबदार असेल अशी बोचरी टीका मलिक यांनी केली आहे. वाढणाऱ्या रुग्णसंख्येला भाजप जबाबदार असेल, अशी टीका मंत्री मलिक यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढले असून जवळपास दीड हजार ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे एकीकडे चिंता वाढली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार रंगात आला आहे. या प्रचारसभांना मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
तसेच मंत्री मलिक यांनी यावर बोलताना “मुंबई, महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत आहे. पंतप्रधान लोकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवायला, मास्क लावायला सांगत आहेत. पण तरीही भाजपाचे लोक त्यांचं ऐकत नाही. उत्तर प्रदेशमध्ये गृहमंत्री, योगी हजारोंच्या संख्येनं लोक जमवतायत. त्यांच्या प्रचारसभा थांबत नाहीत. इतर राज्यांत निवडणुका असताना दुसरी लाट आली, त्याचप्रमाणे तिसरी लाट निर्माण करण्यात भाजपाच्या लोकांचा हात राहील हे स्पष्ट आहे”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.