बहुतांश राज्यांमध्ये संसर्ग नियंत्रणात : केरळसह ठराविक राज्यांमध्येच अधिक रुग्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना विषाणूची तिसरी लाट पूर्णपणे दूर होत असल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी मान्य केले. मात्र, केंद्राने केरळसह काही राज्यांतील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीचे वर्णन करताना आपण कोरोना महामारी आणि विषाणूबद्दल बरेच काही शिकलो आहोत, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल गुरुवारी म्हणाले. याप्रसंगी त्यांनी लसीकरण मोहिमेत गाठलेल्या लक्ष्याचीही माहिती दिली.
कोरोना विषाणूशी लढण्यासाठी संपूर्ण जगाने एकजूट दाखवली पाहिजे, असे डॉ. पॉल म्हणाले. भारतात कोरोना संसर्गाची स्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. तथापि, केरळ, मिझोराम, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या राज्यांमध्ये अजूनही कोविड पॉझिटिव्हिटी दर अधिक आहे. या राज्यांमध्ये अजूनही मोठय़ा प्रमाणात नव्या रुग्णांची नोंद होत असल्याने आरोग्य यंत्रणेने सजगता बाळगलीच पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
केरळमध्ये सध्या सर्वाधिक 2 लाख 50 हजारहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. तसेच महाराष्ट्रात 86 हजार, तामिळनाडू 77 हजार आणि कर्नाटकात 60 हजार सक्रिय रुग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली. सध्या देशातील 61.25 टक्के सक्रिय प्रकरणे या चार राज्यांमधून येत आहेत. भारतात गेल्या एका आठवडय़ात सरासरी 96 हजारच्या जवळपास प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसेच गेल्या 24 तासात 67,084 नवीन कोविड रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात 7 लाख 90 हजार 789 इतके सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या चार दिवसांपासून देशात एक लाखांहून कमी नवे रुग्ण सापडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दिवसभरात 1,241 मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशात 4 कोटी 24 लाख 78 हजार 60 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, आतापर्यंत 5 लाख 6 हजार 520 जणांचा कोरोना संसर्गामुळे बळी गेला आहे. सध्या दैनंदिन मृतांचा आकडा 1 हजारच्या आसपास आहे. बुधवारी दिवसभरात 1 हजार 241 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
पात्र लाभार्थींपैकी 96 टक्के लोकांना पहिला डोस
सरकार कोरोनाविरुद्ध देशव्यापी लसीकरणात वेगाने काम करत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, पात्र लाभार्थींपैकी 96 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. ही कामगिरी कोणत्याही सरकारसाठी स्वप्नपूर्तीसारखी असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले. लसीकरण मोहिमेला लक्षणीय प्रतिसाद मिळत असल्याचा आम्हाला आनंद असल्याचेही त्यांनी नमूद केले.