ऑनलाईन टीम / नागपूर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मधील जिल्हा प्रशासनाकडून कारोनाच्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, नागपूर जिल्हा परिषदेचे कामकाज आज (सोमवार) पासून 30 ऑगस्टपर्यंत म्हणजेच जवळपास आठवडाभरासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या इमारतीचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. या कालावधीत जिल्हा मुख्यालयातील सर्व कामकाज बंद असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांमध्ये नागपूर जिल्हा परिषद कार्यालयातील 18 कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. कारण सरकारने अनलॉक केले असले तरी शासकीय कार्यालयात किती जणांनी कामासाठी यावे या संदर्भात नियम आखून दिले आहेत. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना मुख्यालयात कामासाठी बोलावले जात आहे. तसेच ग्रामीण भागातील लोकं देखील कामे करून घेण्यासाठी येत आहेत त्यामुळे मुख्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. आणि हेच कोरोना संसर्ग वाढण्याचे मुख्य कारण आहे.
त्यामुळे काल झालेल्या बैठकीत जिल्हा परिषदेचे कामकाज एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्यांना आता आणखी आठवडाभर वाट पहावी लागणार आहे.