कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
अंग दुखतेय.. दोन दिवस झोपून आहे.. बाबारे तपासणी नको…! कारण विचाराल तर साधा सर्दी, खोकला हाय.. हे उत्तर.. त्यामागे लपलीय कोरोनाची भीती..! रूग्णाला ‘कोरोना’ची भीती, तपासणी करावी तर रिपोर्ट पॉझिटिव्हची अन् त्यानंतर कोरोंटाईनची धास्ती.. आपल्यामुळे कुटुंब.. कोरोटाईन होईल.. गल्लीत चर्चा…हे सारं नकोच..त्यापेक्षा आपण मेडीकलमधल्या गोळय़ा घेऊ या.. घरीच औषधोपचार घेऊ या.. ही सर्वसामान्य रूग्णांतील अधिकतरांची प्रतिक्रिया.. पण कम्युनिटी स्प्रेड सुरू असताना हे सारं जीवावर बेतणार ठरतेय.. याकडे होणारं दुर्लक्ष प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणारं आहे.
सप्ताहभरात पॉझिटिव्ह रूग्णांची दुपटीने वाढलेली संख्या. बळींचा आकडाही रोज डबल होतोय.. कोरोन मृत्यू रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. व्हेंटिलेटरची संख्या वाढतेय, ऑक्सिजन बेड वाढत आहेत. खासगी हॉस्पिटलमधील बेड राखीव ठेवले आहेत. तरीही व्याधीग्रस्तांची जोखीम वाढत आहे. हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब, किडनी विकार, अस्थमा आदी रूग्णांसाठी बदलते वातावरण जसे जोखमीचे ठरत आहे. तितकीच कोरोनाची भीती जोखमीची ठरली आहे.
जिल्हा प्रशासनाने लहान मुले, ज्येष्ठांच्या प्रवासावर मर्यादा आणली आहे. गेली पाच महिने अनेक कुटुंबांतील व्याधीग्रस्तांवर घरीच उपचार सुरू आहेत. कोरोना काळात काहींनी टेलिमेडीसिनचा आधार घेतला आहे. काहींना फॅमिली डॉक्टर अन् छोटी क्लिनिक आधार ठरली आहेत. त्यातूनही विकार वाढल्यास तातडीची आरोग्य सेवा आवश्यक ठरत आहे. पण कोरोनामुळे काही हॉस्पिटल्स ‘ओन्ली कोरोना’ झाली आहेत. काही धोका पत्करण्यास तयार नाहीत. व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची सुविधा असलेल्या हॉस्पिटल्समध्ये तातडीच्या सेवेसाठी व्याधीग्रस्त, सामान्य रूग्णांना फिरावे लागत आहे. त्यांची ही स्थिती पाहिली, ऐकल्यानंतर सर्वसामान्यांनी कोरोनाची धास्ती घेतली आहे.
सद्यस्थितीत कोरोना बळींचा आकडा तीनशेवर आहे. पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11 हजारांवर आहे. दररोजची कोरोना नव्या रूग्णांची टक्केवारी 15 टक्के आहे. आहे. कोरोना मृत्यूची टक्केवारीही वाढत आहे. अशा स्थितीत ताप, थंडी, अंगदुखीने त्रासलेल्या रूग्णांनी अंगावर काढणे सुरू केले आहे. काहींनी मेडीकल स्टोअर्समधील गोळय़ांचा आधार घेतला आहे. काहींनी पारंपरीक, अन्य वैद्यकीय शाखांतील उपचार सुरू केले आहेत. घरोघरी असे रूग्ण आहेत. त्यात महिलांची संख्या अधिक आहे. तपासणी करावी म्हटल्यास कोरोना पॉझिटिव्हची धास्ती त्यांना आहे. फक्त कुटुंबांची काळजी, अन् संपुर्ण कुटुंबाची तपासणी, कोरोंटाईनच्या भीतीने अनेकजणांनी हॉस्पिटल्समध्ये उपचार घेणे टाळले आहे. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी लढा देत असली तरी सर्वसामान्यांत असलेली कोरोनाची धास्ती हीच प्रभावी औषधोपचारात अडसर ठरत आहे. परिणामी अशा हायरिस्क रूग्णांमुळे कोरोना बळींची संख्या वाढण्याचा धोका अधिक असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.