ऑनलाईन टीम / चंदीगड :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्ये तर दिवसेंदिवस रुग्ण संख्या लक्षणीय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने बुधवारी एक मोठा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता पंजाबमध्ये 30 एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. हा कर्फ्यू प्रदेशातील सर्व जिल्ह्यात असणार आहे. रात्री 10 ते सकाळी 5 च्या दरम्यान हा कर्फ्यू असणार आहे. यापूर्वी नाईट कर्फ्यू प्रदेशातील केवळ 12 जिल्ह्यांमध्ये 10 एप्रिलपर्यंत लागू होता. मात्र, आता सर्व जिल्ह्यात कर्फ्यूची घोषणा करण्यात आली.
बुधवारी मुख्यमंत्री कॅप्टन. अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर सर्व जिल्ह्यात नाईट कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला आहे. दर्मम्यान, यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की, लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन नाही केले तर 8 एप्रिलपासून कधिक कडक निर्बंध लादले जातील.
त्यानुसार आता प्रदेशातील सर्व राजकीय कार्यक्रम पूर्णपणे थांबविण्यात आले आहेत. तसेच बाहेर होणाऱ्या कार्यक्रमांना केवळ 100 नागरिक आणि जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी 50 नागरिकांनाच परवानगी देण्यात आली आहे. तसेच बाहेर पडताना नागरिकांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर महामारी ॲक्ट अंतर्गत केस केली जाईल.
दरम्यान, यापूर्वी मंगळवारी चंदीगड प्रशासनाने शहरात वाढत असलेली रुग्ण प्रमाण लक्षात घेऊन नाईट कर्फ्यूचे आदेश दिले होते. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. यामधून केवळ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना सूट दिली आहे.