तज्ञ डॉक्टरांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला : शासकीय पातळीवर चर्चा केल्यानंतर निर्णय घेणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणाबरोबरच रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोना संसर्गाची लक्षणे नसणारे किंवा कमी ताप असणाऱया कोरोनाबाधित रुग्णांना घरातच विलगीकृत करून (होम आयसोलेशन) उपचार करण्यात विचार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिली.
विधानसौधमध्ये बुधवारी तज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोनाबाधितांवर चांगल्या पद्धतीने उपचार केले जात आहेत. राज्यात टेलिमेडिसिन व्यवस्था जारी असून अनेक कोविड इस्पितळांमधील डॉक्टरांना बेंगळूरमधील तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करीत आहेत. बैठकीत तज्ञ डॉक्टरांनी अनेक महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. कोरोनाबाधितांचे मनोबल वाढविण्याबरोबरच कोरोनाची लक्षणे नसणाऱया रुग्णांवर घरातच विलगीकृत करून उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे इस्पितळांवर पडणारा ताण कमी होईल असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे, असे ते म्हणाले.
कोरोनाची तीव्र लक्षणे असणारे आणि इतर आरोग्यविषयक समस्या असणारे कोरोनाबाधित आढळल्यास त्यांच्यावर उत्तम प्रकारे उपचार करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे. कोरोनाची प्रकरणे दुप्पट होण्यावर नियंत्रण आणावे, सीलडाऊन केलेले भाग, दाट लोकवस्तीची ठिकाणे आणि गर्दीच्या भागातील नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे, असे मतही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
टेलिमेडिसिन व्यवस्थेद्वारे अधिक रुग्णांवर उपचार करण्यावर भर द्यावा. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी अधिक मनुष्यबळाची आवश्यकता असून इतर खात्यांमधील कर्मचाऱयांचा उपयोग करून घेता येईल, टेलिमेडिसिन आणि उपचाराच्या निकषांबाबत वैद्यकीय कर्मचाऱयांना अधिक प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. कोविड इस्पितळांना व्हेंटिलेटर आणि नव्या औषधांचा पुरवठा यापुढेही नियमित ठेवावा. राज्यात कोरोना संसर्गाबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जनतेत आरोग्य यंत्रणेविषयी विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे सल्लेही तज्ञांनी दिले असून याबाबत शासकीय पातळीवर चर्चा करून निर्णय घेण्यात येतील, असे येडियुराप्पा यांनी सांगितले.