कोरोना विरूद्धच्या लढय़ात गेल्या मार्चपासून आपण सर्व जण लढत आहोत. प्रारंभी आपल्या कोल्हापूर जिल्हय़ात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी होती. पण हळूहळू कोरोना रूग्ण वाढू लागले. पहिल्या लॉकडाऊननंतर जी शिथिलता दिली, त्यानंतर लक्षणीय संख्या काहीशी गंभीर बनू लागली. कोरोनाच्या सामुहिक संसर्गाचा धोका वाढला. परिणामी सर्वपातळीवर विचार करून जिल्हा पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. कोरोनाची तयार होत असलेली साखळी तोडणे हाच एकमेव उपाय आपल्यापुढे सद्यःस्थितीत आहे. सोमवारी लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी शहरवासियांसह जिल्हय़ातील नागरिकांनी ज्या पद्धतीने प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूचना, नियमांचे पालन काटेकोरपणे पालन झाले, त्याबद्दल समाधान आहे.
पण आपल्याला अजून सहा दिवस लॉकडाऊनचे पालन करायचे आहे, ही बाब प्रत्येकांना आपल्या मनावर बिंबविण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी मिळालेला प्रतिसाद हा नागरिकांमध्ये होत असलेल्या जागृतीचे प्रतीक आहे, असे मी मानतो. अत्यावश्यक सेवेत असलेल्यांशिवाय इतरांनी घरीच राहावे, सुरक्षित राहावे, स्वतःची, स्वतःच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची काळजी घ्यावी. सॅनिटायझर, मास्क, फेसशिल्डसारख्या प्रतिबंधात्मक साधनांचा वापर करावा. कोरोनाची साखळी तोडणे हे कुणा एकाचे काम नाही, त्यामध्ये प्रत्येक नागरिकाचा कृतीशिल सहभाग असणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनाला हद्दपार करू शकू. नागरिकांनी सात दिवस लॉकडाऊन काटेकोरपणे पाळावा, नंतरच्या काळातही जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन ज्या सूचना करेल, त्याचेही पालन करावे. घरी रहा, सुरक्षित राहा, आपल्या घरातील लहान मुले, ज्येष्ठ व्यक्ती आणि आजारी व्यक्तींची काळजी घ्या. काही अडचण आली तर जिल्हा प्रशासन, आरोग्य प्रशासन आपल्या मदतीसाठी सज्ज आहे. कोरोनाची साखळी तोडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, हे विसरू नका.
शब्दांकन : संजीव खाडे