कोरोना हळूहळू भारतात पसरू लागला तशी लोकांची चिंता वाढू लागली. आता लॉकडाऊन चार संपूर्ण देशभर लागू झाला आहे. पुढे ही परिस्थिती काय वळण घेणार ते आपण सांगू शकत नाही. पण लगेच काही सगळे सुरळीत होणार नाही हे निश्चित आहे. इटली, अमेरिका, स्पेन, इंग्लंड, फ्रान्स ह्या पुढारलेल्या देशात सर्व आरोग्य सेवा असूनदेखील हा रोग आटोक्मयात आणण्यात अपयश आले आहे. इटलीत आजपर्यंत 31,908 लोक दगावले गेले आहेत तर अमेरिकेत कोरोनाग्रसतांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ह्यावरून पुढारलेल्या देशात आरोग्य व्यवस्था प्रचंड संख्येला संरक्षण देण्यास असमर्थ ठरली आहे. त्यातल्या त्यात चीनमध्ये वूहान प्रांतात सुरू झालेली कोरोनाची लागण थांबवण्यात आली. ह्याला मुख्य कारण म्हणजे, चीनमध्ये आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सरकारी आहे. सरकारने सर्व शक्ती पणाला लावून कोरोनाचा प्रसार थांबवला. त्याउलट भारतासारख्या भांडवलदारी देशात आरोग्य यंत्रणा खाजगी आहे. ही यंत्रणा लोकांचे शोषण करण्यासाठी जास्त व सेवेसाठी कमी राबते. जगातील महामारीला तोंड देताना प्रत्येक देशातील उपलब्ध यंत्रणेवर त्याचे यश अवलंबून आहे. भारतातदेखील, अनेक वर्षे सरकारी यंत्रणेकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आणि खाजगीकरणाकडे कल जास्त राहिला आहे. प्रचंड भ्रष्टाचार करून सरकारी यंत्रणेने आरोग्य क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात कोंबले आहे. हे सर्वच क्षेत्रात घडत आहे. पण मानवहानी त्यातल्या त्यात गरिबांची हानी सर्वात जास्त आरोग्य क्षेत्रात झाली आहे. खाजगीकरणामुळे नवीन हॉस्पिटल, आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये अडगळीत पडली. लोकांनीही त्यांची मागणी आग्रहाने केली नाही. खाजगी डॉक्टरकडे खेटे मारायला सुरुवात झाली. आजारापोटी लाखो कुटुंबे, कर्जबाजारी होऊन उद्ध्वस्त झाली. जेजे, केइएमसारखी उत्कृष्ट सरकारी हॉस्पिटले लाखो रुग्णांच्या दबावाखाली जीर्ण झाली. तुम्ही कधीही ह्या हॉस्पिटलात गेलात तर हजारो रुग्ण व्हरांडय़ात/जमिनीवर पडलेले दिसतात. डॉक्टर आपल्या प्रयत्नांची कमतरता भासू देत नाहीत. पण सरकारी रुग्णालयात, सर्वच गोष्टींचा तुटवडा आहे. औषधे तर अपवादानेच मिळतात. साधारणत: रुग्णांना खाजगी दवाखान्यात पाठविले जाते आणि त्यांचे घर उद्ध्वस्त केले जाते. डॉक्टरांचे बिल भरायला कर्ज घ्यावे लागते. त्यातून तो मरेपर्यंत सुटत नाही. अनेक शेतकऱयांच्या आत्महत्यादेखील या कारणामुळे झाल्या आहेत. त्यात ग्रामीण भागात तर बघायलाच नको. आधीच रुग्णालयाचा व डॉक्टरांचा तुटवडा असतो. त्यात चाचणी करणारी यंत्रणा नसते. खाजगी यंत्रणेकडे एक्स-रे किंवा सी. टी. स्पॅन करायचे झाले तर गरिबांचे मरणच असते. मग ग्रामीण जनतेला, मुंबई, पुणे, नागपूरकडे धाव घ्यावी लागते. तरी देखील सर्वच सुविधा किंवा उपचार सरकारी रुग्णालयात न करण्याचे कारस्थान सरकारने केल्याचे आढळून येते. मी जे जे हॉस्पिटलमध्ये पित्ताशयाच्या उपद्रवामुळे ऍडमिट होतो. पित्त नलिकेतून एक खडा काढायचा होता तर सरकारी हॉस्पिटलने मला खाजगी हॉस्पिटला पाठवले. तिथे रु. दोन लाख खर्च आला. माझे आरोग्य विमा योजनेमध्ये नाव असल्यामुळे मला परवडले. पण एका गरिबाची हालत काय होईल याची आपण कल्पना करू शकतो. 1991 पासून प्रसारमाध्यमातून प्रचार करण्यात आला. खाजगी चांगले आणि सरकारी वाईट हे जर खरे असेल तर आता कोरोनाग्रस्तांची देखभाल कोण करणार. खाजगी क्षेत्र करू शकते का? पण सर्व जगामध्ये सर्व सरकारांना पुढे यावे लागले आहे आणि कोरोनाविरुद्ध लढा द्यावा लागला आहे. त्यामुळे कोरोनाने एक मोठे थोतांड उद्ध्वस्त केले आहे की शेवटी लोकांची काळजी ही सरकारलाच करावी लागणार आहे. कोरोनाविरुद्ध लढा हा सरकारलाच द्यावा लागणार आहे. कुठेही खाजगी क्षेत्र अशा सार्वजनिक कामासाठी पुढे येत नाही. कारण, सार्वजनिक सेवा करण्यात आर्थिक नुकसान होते. जिथे फायदा नसतो तिथे खाजगी क्षेत्र नसते.
आपण पूर्ण देशात बघत आहोत, सगळीकडे जिल्हाधिकाऱयांच्या नेतृत्वाखाली कोरोनाशी लढा दिला जात आहे. सरकारी यंत्रणा सुसज्ज आहे. पोलिस सर्वत्र कार्यरत आहेत म्हणून आपले प्राण वाचणार आहेत. ही जर यंत्रणा नसती तर कुठल्या खाजगी लोकांनी आपल्याला सुविधा आणि संरक्षण पुरविले असते. हे आपल्याला माहीतच आहे. म्हणूनच अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकारी यंत्रणा सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सामान्य लोकांचा सरकारी यंत्रणेवर विश्वास असतो व सरकारी यंत्रणेला सहकार्य करण्याची पण मानसिकता असते. जनतेमध्ये आणि सरकारी यंत्रणेमध्ये एक अतूट नाते बनते. त्यामुळे दैनंदिन जीवनामध्ये आपले सरकार हे मायबाप सरकार आहे याची जाणीव ठेवली पाहिजे आणि या यंत्रणा कार्यक्षम आणि सक्षम केल्या पाहिजेत. जितकी सरकारी यंत्रणा सक्षम होईल तितकेच सामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल. म्हणून दैनंदिन जीवनातदेखील आपण आपल्या तालुक्मयाच्या, जिल्हय़ाच्या रुग्णालयात सर्व सुविधा, डॉक्टर, नर्स उपलब्ध करून घेण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
कोरोनाचा परिणाम दैनंदिन जीवनावर तर झालाच आहे पण रोगाबरोबर सर्वात मोठे संकट रोजगारावर पडले आहे. मजुरीवर जगणारा माणूस हवालदिल झाला आहे. त्याचबरोबर पूर्ण देशात कारखाने, सरकारी सेवा बंद झालेल्या आहेत. खाजगी कारखाने बंद पडल्यामुळे अनेकांचा रोजगार नष्ट झाला आहे. स्वयंरोजगारावर अवलंबून असणारे लोक हवालदिल झाले आहेत. शेतकऱयांचा माल शेतात अडकल्यामुळे विक्री होत नाही, त्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही. अर्थव्यवस्थेवर तर गंभीर परिणाम होतच आहे. पण सामान्य माणसाला, मजुराला, शेतकऱयाला कुठलाच आधार नाही. परिस्थिती अशी आली आहे की यातून लोकांना मदत कशी करायची याची कल्पना सरकारला नाही. जे कुटुंब मजुरीवर चालते त्याला दोन वेळेचे अन्न मिळण्यासाठी व कुटुंबाला सांभाळण्यासाठी आपल्याकडे कुठलाच कार्यक्रम नाही. वाहतूक यंत्रणा बंद पडल्यामुळे ग्रामीण व दूरगामी क्षेत्रात अन्न-धान्य व जीवनाश्यक वस्तु पोचविण्यासाठी कुठलीच योजना नाही. सरकारने पूर्ण देश बंद करून टाकला. पण देशातले लोक जगणार कसे याचा विचार केलेला दिसत नाही. आणि जिल्हास्तरावर जिल्हा प्रशासन कुठलीच तरतूद करू शकत नाही. त्यामुळे सरकारला आणीबाणीची घोषणा करावी लागणार. व खाजगी आणि सरकारी यंत्रणेला लोकांचा कोरोनापासून संरक्षण करण्याबरोबरच त्यांचे दैनंदिन जीवनसुद्धा सुसह्य राहावे म्हणून ठोस कृती कार्यक्रम राबवावा लागणार आहे.
अजून लोक विरोधाचा सूर काढत नाहीत कारण सर्वांनाच परिस्थितीची कल्पना आहे व सरकारला सहकार्य करण्याची मानसिकता आहे. पण ही सहनशक्ती कुठपर्यंत टिकेल हे आपण सांगू शकत नाही कारण उपासमारीने मरणारा माणूस जगण्यासाठी काहीही करू शकतो. जसे मोदी साहेबांनी लॉकडाऊनची घोषणा केल्याबरोबर दुकाने आणि बाजारपेठेमध्ये ही झुंबड लागली. ती आवरताना पोलिसांना कठीण झाले. आपल्या मुलाबाळांना अन्न मिळाले पाहिजे ह्यासाठी एक माणूस काहीही करू शकतो. अशी परिस्थिति आली तर जंगलराज काही दूर नाही, याची सरकारने वेळीच दक्षता घेतली पाहिजे व लॉकडाउनच्या स्थितीमध्ये लोकांना जीवनाश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही वेळ अशी आहे की जनतेनेदेखील स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सुदैवाने आपल्या देशात पंचायतराज व्यवस्था आहे म्हणून लोकापर्यंत पुरवठा करणारी यंत्रणा उपलब्ध आहे. या यंत्रणेला आपली जबाबदारी पार पडावी लागेल. ग्रामपंचायतीपासून जिल्हाधिकाऱयापर्यंत उपलब्ध यंत्रणेला पुनर्गठन करून सेवाभावी संस्थांना बरोबर घेऊन पुढची तयारी करावी लागेल व येणाऱया संकटांना तोंड देण्यासाठी सर्व स्तरावर संघटित झाले पाहिजे.
ब्रिगे. सुधीर सावंत