मृतांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदतनिधी वितरित
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनासारखी महामारी शतकातून कधीतरी एकदा येत असते. गत वर्षापासून संपूर्ण जगावरच हे संकट आलेले आहे. कोरोना महामारी अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची आणि कुटुंबातील सदस्य तसेच आपल्या सभोवताली लोकांचीही शक्य तेवढी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
राज्यात कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह मदतनिधी वितरित करणे तसेच कोरोनाचा फटका बसलेल्या असंघटीत घटकांना मदत करण्यासाठी अर्जांचे वितरण करण्यासाठी शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. समाज कल्याण खात्यातर्फे पणजीत मिनेझीस ब्रागांझा सभागृहात आयोजित या कार्यक्रमास व्यासपीठावर त्यांच्यासोबत खात्याचे संचालक उमेशचंद्र जोशी, उपसंचालक तहा हाजीक, सांतान फर्नांडीस आणि इतरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुमारे 57 जणांच्या कुटुंबियांनी पहिल्या टप्प्यात मदत वितरित करण्यात आली.
अशा प्रकारची योजना राबवून आम्ही खूप मोठे कार्य केले आहे, असा दावा आपण करत नाही. परंतु अशा प्रकारे प्रत्येक मृताच्या कुटुंबास 2 लाख रुपये मदतनिधी देणारे गोवा हे देशातील पहिले राज्य आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
कोविडमुळे अनेकांचे बळी गेले ही खरोखरच दुःखद घटना आहे. काही कुटुंबात तर दोन तीन सदस्यांचे सुद्धा बळी गेले आहेत. काहींनी आपली एकमेव कमावती व्यक्ती गमावली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठीण प्रसंग उदभ्वलेला आहे. अशावेळी त्यांना मदत करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य होते. त्याच कर्तव्य भावनेतून आम्ही हा मदतनिधी देण्याचे प्रयत्न केले आहेत.
या मदतनिधीसाठी 125 अर्ज वितरित करण्यात आले होते. त्यातील 55 ते 57 जणांनी ते पूर्ण भरून दिले आहेत. त्यांना आज येथे मदतनिधी वितरित करण्यात येत आहे. उर्वरित सर्वांनी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांनाही मदत देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने अर्जासोबत कोरोनामृताचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असून काहींना अद्याप ती प्रमाणपत्रे मिळालेली नसल्याने अर्ज सादर करण्यात उशीर झाला असावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, राज्य सरकारच्या विविध योजना असून त्यांचा लाभ प्रत्येक गरजवंतास मिळावा यासाठी प्रत्येक पंचायतीत उपस्थित स्वयंपूर्ण मित्रांच्या माध्यमातून सरकार सहकार्य करणार आहे. सर्वांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले.
समाजकल्याण सचिव राजशेखर यांनीही यावेळी विचार मांडले. ज्यांना लाभार्थींना मुख्यमंत्र्यांनी मंजुरीपत्रे दिलेली आहेत, त्यांच्या खात्यात लगेच पैसे जमा होतील, असेही ते म्हणाले. प्रदीप नाईक यांनी सुत्रसंचालन केले.