‘लॉकडाऊन-1’ अंमलबजावणीची आज वर्षपूर्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना संसर्गाचा प्रकोप रोखण्यासाठी वर्षभरापूर्वी आजच्याच दिवसापासून म्हणजे 25 मार्च 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचे पहिले लॉकडाऊन जारी केले होते. पंतप्रधानांनी देशवासियांना घरातच राहण्याचे आवाहन करत वारंवार हात धुवावे, दो गज दुरी अर्थात सोशल डिस्टन्सिगचे पालन करावे आणि मास्क वापरावा यासह काही मार्गदर्शक सूचना केल्या होत्या. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘अनलॉक’ काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या घरात गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच विदेशात आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केल्यामुळे सर्वांनी सद्यस्थितीतही काळजी घेणे आवश्यक आहे.
‘लॉकडाऊन-1’ ही कोरोनाचा प्रसार थोपवण्यासाठी उघडण्यात आलेल्या मोहीमेची सुरूवात होती. 25 मार्च हा दिवस त्यासाठी ऐतिहासिक ठरला होता. संपूर्ण देशभरात शांततेला सुरुवात झाली होती. ना वाहनांच्या हॉर्नचा आवाज, न रस्त्यांवर वर्दळ होती. बाजारपेठ मंदावली होती. व्यवहार ठप्प झाले होते. केवळ औषध दुकाने, भाजीपाला, अन्नधान्य, दूध यासारख्या अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवण्यात आल्या होत्या. या ‘लॉकडाऊन’नंतर कोरोनाचे भय सगळय़ा विश्वात विस्तारत होते. माणसे मरत होती. देश पुन्हा कधी रुळावर येईल याची कुणालाच कल्पना नव्हती. सर्वत्र अनिश्चितता होती.
कोरोनाने राजा आणि रंक, लहान आणि मोठा, कामगार आणि मालक, स्त्री आणि पुरुष या सगळय़ांनाच एकाच पातळीवर आणून ठेवले होते. लोकांमध्ये भीती होती. मात्र इलाज नव्हता. सगळे आपापल्या घरात या भयाच्या छायेत टीव्हीसमोर बसून भयावह बातम्या बघत-ऐकत होते. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात अनेक महिने गेल्यानंतर अखेर निर्बंध शिथिल झाले. ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू झाली. व्यवहार अंशतः सुरू झाले अन लसही तयार झाली. नव्या वर्षारंभी देशात दोन लसी आल्या अन् 16 जानेवारी 2021 पासून देशव्यापी लसीकरणाला प्रारंभ झाला. या लसीकरणाला दोन महिने उलटून गेले असले तरी अद्याप कोरोना संसर्ग नियंत्रणात आलेला नाही. त्यासाठी अजूनही देशवासियांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. अर्थव्यवस्था सावरण्यासाठी केंद्र सरकारने सर्व व्यवहार सुरू ठेवले असले तरी आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाला आपापल्या पद्धतीने सावधगिरी बाळगून आणखी काही महिने नियमांचे पालन करावे लागणार आहे.
संसर्ग टाळण्यासाठी दक्ष रहावेच लागेल !
कोरोनाची लस आल्यावर संसर्ग रोखला जाईल असा समज सुरुवातीला होता. मात्र आज वर्षभरानंतरही चित्र खूप वेगळे आहे. मागील वर्षी आजच्याच तारखेला देशात केवळ 360 पॉझिटिव्ह रुग्ण होते. आज देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3 लाख 68 हजारहून अधिक आहे. एकटय़ा महाराष्ट्रातच दोन लाखांपेक्षा अधिक रुग्ण आहेत. 1 कोटी 17 लाखाहून अधिक लोक कोरोनाच्या जाळय़ात अडकले आहेत. अनेक लोक त्यातून बरेही झाले. त्यावेळेच्या आजच्या स्थितीतला सगळय़ांत मोठा बदल म्हणजे साडेतीनशे रुग्णसंख्या असताना अभूतपूर्व अशी अनिश्चितता आणि भय होते. आज कोटीच्या घरात बाधित सापडल्यानंतर ते भय कमी झाले असले तरी पूर्णपणे कमी झालेले नाही. बेफिकिरी आणि नियमांच्या ऐशीतैशीमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अशा स्थितीत प्रत्येकानेच योग्य काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सावधगिरीच्या योग्य उपाययोजना न केल्यास नजिकच्या काळात पुन्हा ‘लॉकडाऊन’ची कुऱहाड कोसळू नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहणे आवश्यक आहे.