देशात गेल्या 24 तासात 42 हजार रुग्णांची नोंद – 308 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाची तिसरी लाट कधीही येण्याची शक्मयता असताना अद्याप दुसरी लाट ओसरल्याचे दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 42 हजार 766 नव्या रुग्णांची भर पडली असून 308 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 38 हजार 091 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापूर्वी शनिवारी देशात 42 हजार 618 कोरोनाचे रुग्ण सापडले होते. शनिवारी दिवसभारत केरळमध्ये सर्वाधिक म्हणजे 29 हजार 682 रुग्णांची भर पडली आहे. तसेच 142 लोकांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत केरळमध्ये 41 लाख 81 हजार 137 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्रात शनिवारच्या चोवीस तासात 4 हजार 130 इतके रुग्ण सापडले असून 64 जणांचा बळी गेला आहे.
देशात आतापर्यंत कोरोनामुळे 3 कोटी 29 लाख 88 हजार 673 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकूण रुग्णांपैकी 4 लाख 40 हजार 533 जणांचा बळी गेला असून 3 कोटी 21 लाख 38 हजार 92 जणांनी कोरोनावर यशस्वी उपचाराअंती मात केली आहे. सध्या देशात 4 लाख 10 हजार 48 इतके सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.