कुटुंबियांचीपर्वानकरता 86 एस.टी.कर्मचारीमुंबईत
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सध्या एस. टी. अनेक संकटातून जात आहे. त्याचा ताण सर्वांवरच आहे. पण जेव्हा हे संकट देशावर, राज्यावर, समाजावर येते तेव्हा मात्र आपल्या व्यथा, अडचणी बाजूला ठेवून लालपरीचे हे कमांडो नेहमीच मदतीला धावतात, हे आजवर सिद्ध झाले आहे. हाच अनुभव कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आला. कोरोनाच्या आपत्तीतही पाच लालपरीतून 86 चालक आणि वाहक शेकडो कि.मी. दुरून एस.टी. च्या सेवेत दाखल झाले आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हय़ातील 6 एस. टी. कर्मचाऱयांचा समावेश आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे डॉक्टर्स, शासकीय रूग्णालयातील कर्मचारी, पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी अशा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱया कर्मचाऱयांच्या वाहतुकीचा भार एस.टी. महामंडळावर देण्यात आला आहे. त्यासाठी मुंबई, ठाणे, पालघर विभागातर्फे शासनाच्या आदेशानुसार विशेष वाहतूक करण्यात येत आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या तिन्ही विभागाचे कर्मचारी गावाला निघून गेले होते. त्यामुळे एस. टी. महामंडळाने चालक आणि वाहकांची कमतरता भासू नये, यासाठी सोलापूर, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि नाशिक विभागाचे एस.टी.चे चालक आणि वाहकांना बोलावण्यात आले आहे. एकीकडे लॉकडाऊनमुळे संपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. तसेच कोरोनाच्या भीतीमुळे गावबंदी करण्यात आली आहे. अशा भीतीमध्येसुध्दा लालपरीचे कर्मचारी आपली सेवा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. रायगड विभाग 20, सातारा 16, रत्नागिरी 6, सोलापूर 23 आणि नाशिक 21 असे एकूण 87 एसटीचे वाहक आणि चालक मुंबईत दाखल झाले आहेत.