प्रतिनिधी/ बेळगाव
संपूर्ण जगावर आक्रमण केलेल्या कोरोनाच्या आव्हानाला तरुण डॉक्टरांनी कणखरपणे सामोरे जावे आणि या रोगाशी लढा द्यावा, असे आवाहन करतानाच युवा डॉक्टरांनी ग्रामीण भागात सेवा करण्यास प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केली.
केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऑफ रिसर्च अर्थात काहेर विद्यापीठाचा पदवीदान समारंभ मंगळवारी सकाळी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून पार पडला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. के. सुधाकर यांनी हे आवाहन केले. बेंगळूरमधून डिजिटल व्यासपीठावरून डॉ. के. सुधाकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अध्यक्षस्थानी केएलई विद्यापीठाचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे होते.
डॉ. के. सुधाकर म्हणाले, आपल्या देशात 70 टक्के जनता ग्रामीण भागात राहते, जी वैद्यकीय सुविधा आणि डॉक्टरांपासून वंचित राहिली आहे. या भागात वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी पदवी पूर्ण केलेल्या युवा डॉक्टरांनी किमान पाच वर्षे ग्रामीण भागात सेवा करावी. पदवी मिळाली म्हणजे शिक्षण संपले असे नाही. वैद्यकीय क्षेत्रात सतत घडामोडी, संशोधन आणि नवीन प्रवाह येत असतात. त्याचा डॉक्टरांनी सतत अभ्यास केला पाहिजे.
समाज आजसुद्धा डॉक्टरांना देवदूत मानतो. पदवीमुळे तुमच्या पेशावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, समाजाला डॉक्टरांकडून खूप अपेक्षा आहेत. कोविड-19 शी भारतातील डॉक्टरांनी कणखर सामना केला आहे. त्यामुळे सर्व भारतीय डॉक्टर प्रशंसेस पात्र आहेत, असेही ते म्हणाले.
केएलई सोसायटीची स्थापना करणाऱया सप्तर्षींनी शिक्षण, आरोग्य, कृषी या सर्व क्षेत्रात शांतपणे क्रांती घडविली. डॉ. प्रभाकर कोरे यांनी त्यांचे कार्य यशस्वीपणे पुढे नेले. आज केएलई आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहे. केएलईमुळे बेळगावला शैक्षणिक हब हा दर्जा मिळाल्याचे सांगून सर्व पदवीप्राप्त डॉक्टरांचे डॉ. के. सुधाकर यांनी अभिनंदन केले.
कुलगुरु डॉ. विवेक सावजी यांनी राज्यामध्ये काहेर हे दुसऱया क्रमांकाचे उत्कृष्ट विद्यापीठ आहे. विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी थॉमस जेफर्सन विद्यापीठातून 8 ते 10 विद्यार्थी या विद्यापीठात शिकण्यास येतात. पुढीलवषी हुबळीमध्ये केएलईचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल तर बेंगळूरमध्ये ऍस्टर ग्रुपच्या सहकार्याने हॉस्पिटल होणार आहे. पुणे हॉस्पिटलचा प्रकल्प आणि बेळगावचा कॅन्सर हॉस्पिटल प्रकल्प पूर्णत्वास येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
44 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक
या पदवीदान समारंभात डॉ. शिवानी मरेगुड्डी, डॉ. विशाल कुलगोड, डॉ. संदेश जोशी या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्तेचे सुवर्णपदक पटकाविले. डॉ. निहारिका सबरवाल व डॉ. रोशन रांगणेकर यांनी बीडीएस विभागात सुवर्णपदक मिळविले. या समारंभात 44 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, 12 विद्यार्थ्यांना पीएचडी देण्यात आली. 9 विद्यार्थ्यांना डीएम, एमसीएच, 400 विद्यार्थ्यांना पदविका, 886 विद्यार्थ्यांना पदवी व 51 विद्यार्थ्यांना डिप्लोमा पदविका, 14 विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट कोर्स, 10 विद्यार्थ्यांना पाठय़वृत्ती व 16 विद्यार्थ्यांना डिप्लोमा पदवी देण्यात आली.
हा समारंभ सामाजिक अंतर पाळून निमंत्रित व्यक्तींच्याच उपस्थितीत पार पडला. परीक्षा नियंत्रक डॉ. सुनील जलालपुरे यांनी पथसंचलनाचे नेतृत्व केले. कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांनी सुवर्णपदक विजेत्यांची नावे जाहीर केली. याप्रसंगी कार्यकारिणीचे सदस्य तसेच डॉ. व्ही. ए. साधुण्णावर, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, डॉ. बी. जी. देसाई, डॉ. एम. व्ही. जाली, डॉ. निरंजना महंतशेट्टी, डॉ. आर. एस. मुधोळ, डॉ. अलका काळे, डॉ. श्रीनिवास प्रसाद आणि सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते. डॉ. अविनाश कवी व डॉ. नेहा धडेद यांनी सूत्रसंचालन केले.