ऑनलाईन टीम / मुंबई :
मे अखेरीस राज्यात 1.5 लाख कोरोना केसेस असतील, असा अंदाज होता. मात्र, नागरिकांनी लॉकडाऊन नियमांचे पालन केल्याने कोरोना संक्रमणाचा आकडा आटोक्यात आला आहे. आज आपल्याकडे प्रत्यक्षात 33 हजार 686 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तर 13 हजार 404 रुग्ण बरे झाले असून, 1577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अंदाजापेक्षा कोरोना संक्रमणाचा आकडा कमी झाला असला तरी कोरोनाच्या गुणाकाराला मर्यादा नाही, त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, राज्यात अंदाजापेक्षा कोरोनाबधितांचा आकडा कमी आला असला तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोनाच्या गुणकाराला मर्यादा नसल्याने आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. कोरोनाचा गुणाकार जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे खबरदारी म्हणून मे अखेरीस रुग्णांसाठी 14 हजार बेडस उपलब्ध करण्यात येतील. अनेक मैदाने आणि सभागृह खुली केली जातील. आगामी काळात पावसाचेही संकट येणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात आणखी खबरदारी घ्यावी लागेल. कोरोनासोबत जगायचं म्हणजे नक्की काय करायचं ते आपल्याला शिकावे लागेल.
सर्दी खोकल्यापेक्षा ताप, तोंडाची चव जाणे, वास न येणे ही कोरोनाची लक्षणे धोकादायक आहेत. हायरिस्क पेशंटला कोरोनाचा धोका अधिक आहे. दरम्यान, राज्याला पुन्हा रक्त पुरवठ्याची गरज भासत आहे. त्यामुळे ज्यांना रक्तदान करायचे आहे , त्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे.