आरोग्य विभागाचे प्रतिपादन, साथ पसरली तरी घाबरण्याचे कारण नाही !
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाच्या साथीचा वेगाने प्रसार तबलीग जमातशी संबंधित रूग्णांमुळेच होत आहे. या रूग्णांची संख्या आता 1 हजार 23 वर पोहचली असून ती एकंदर रूग्णसंख्येच्या 30 टक्क्यांहून अधिक आहे. भारतातील एकंदर रूग्णसंख्या वाढली असली तरी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण या वाढीचे ‘समूहस्थान’ (क्लस्टर) एकच असून ते तबलीगशी संबंधीत आहे. त्यापलीकडे देशात कोरोनाचा प्रसार काळजी करण्याइतक्या प्रमाणात झालेला नाही, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकारपरिषदेत केले.
केंद्र सरकारने देशभरात चाचणी क्षमता वाढविली आहे. आता प्रतिदिन 10 हजारहून अधिक रूग्णांच्या चाचण्या केल्या जात आहेत. अद्याप तबलीग आणि तिच्याशी संबंधित लोक वगळता या साथीचे समाजसंक्रमण झाल्याचे दिसून आलेले नाही. लोकांनी ऊर्वरित काळासाठी लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळल्यास रूग्णसंख्या अटोक्यात राहील असेही प्रतिपादन त्यांनी केले.
रूग्ण्संख्या तीन हजारपर्यंत
शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 2 हजार 902 इतकी आहे. ती शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच्या वेळेपेक्षा 601 ने अधिक आहे. याच कालावधीत 12 रूग्णांचा मृत्यू होऊन संख्या एकंदर 68 झाली आहे. एकंदर रूग्णसंख्येपैकी 58 जणांची प्रकृती गंभीर आहे. हे रूग्ण प्रामुख्याने केरळ, मध्यप्रदेश आणि दिल्लीतील आहेत. अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.
17 राज्यांमध्ये प्रसार
तबलीगसंबंधित रूग्णांची संख्या 17 राज्यांमध्ये वाढली आहे. या संस्थेशी संबंधित संशयितांची संख्या या राज्यांमध्ये एकंदर 22 हजार आहे. त्यांना शोधून त्यांचे विलगीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या एकाच समाजघटकावर लक्ष केंद्रीय करावे लागणार आहे. इतरत्र परिस्थिती नियंत्रणात आहे, असे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
प्रयोग शाळाही वाढल्या
देशात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या आता 100 हून अधिक झाली आहे. शिवाय अनेक खासगी प्रयोगशाळांनाही अनुमती देण्यात आली आहे. त्यामुळे आता अधिकाधिक लोकांची चाचणी करणे शक्य होईल. आतापर्यंत केलेल्या 75 हजार चाचण्यांपैकी पुष्कळशा नकारात्मक आहेत. त्यामुळे या रोगाचा प्रसार अद्यापपावेतो नियंत्रणात असल्याचे ते म्हणाले.
संख्येत अंतर
राज्यांनी दिलेली आकडेवारी आणि केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीत मोठे अंतर दिसून येत आहे. राज्यांच्या संकलित आकडेवारीनुसार भारतातील रुग्णांची संख्या 3 हजार 250 असून मृत्यूंची संख्या 91 आहे.
महाराष्ट्रच आघाडीवर
रूग्णसंख्या आणि मृत्यूंमध्ये आजही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. राज्यात मृतांची संख्या 19 असून रूग्णांची संख्या 500 हून अधिक आहे. त्या खालोखाल केरळचा क्रमांक लागतो. तेथे रूग्णांची संख्या 375 असून मृत्यू 5 झाले आहेत. याशिवाय पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात रूग्णांची संख्या प्रत्येकी 100 हून अधिक आहे.
दीपप्रज्वलन करताना काळजी घ्या
5 एप्रिलला सर्वांनी रात्री 9 वाजता दीपप्रज्वलन करावे असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. मात्र, दीपप्रज्वलन करीत असताना नागरीकांनी काळजी घ्यावी. ऑल्कोहोलमिश्रित हँड सॅनिटायझरचा उपयोग दीपप्रज्वलन करण्याअगोदर करू नये. कारण ऑल्कोहोल हा ज्वालाग्रही पदार्थ आहे. त्याचा दीपातील ज्योतीला स्पर्श झाल्यास इजा होऊ शकते. म्हणून सावधपणे दीपप्रज्वलन करावे, अशी सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे.