ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे कोरोनाची रुग्णसंख्या स्थिरावली आहे. मात्र बेसावध न राहता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन काटेकोर नियोजन करा. जिह्या जिह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारा, आवश्यक औषधांचा साठा राहील याची काळजी घ्या. केवळ घोषणा नकोत तर प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसायला हवी, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दृरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कडक निर्बंध लावल्यानंतर लगेचच रुग्णसंख्येत उतार पडेल असे नाही. तरी देखील वेळेत कडक निर्बंध लावल्याने अंदाजित मोठी रुग्ण वाढ आपण रोखू शकलो. मात्र, आता तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग महत्वाचा आहे पण त्यासाठी पुरेशा प्रमाणात व वेळेवर लस पुरवठा करणे अतिशय गरजेचे आहे. आपण आता 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे, मात्रआता पुरवठ्यानुसार त्याचे नियोजन करावे लागेल तसेच जिह्या जिह्यांमध्ये याची अंमलबजावणी देखील व्यवस्थित पार पाडावी लागणार आहे.
आज ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट्सची गरज आहे तिथे आवश्यक त्या परवानग्या दिल्या आहेत. नसतील तर तात्काळ देण्यात येत आहेत मात्र कोणत्याही परिस्थितीत येत्या काळात पुरेसा ऑक्सिजन रुग्णांसाठी उपलब्ध राहील याची दक्षता जिल्हा प्रशासनाने घ्यावयाची आहे. याबाबत कोणतेही कारण चालणार नाही. तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून आवश्यक त्या औषधांचा साठा आत्तापासून करून ठेवा. यासंदर्भात राज्यातील टास्क फोर्सचे डॉक्टर्स मार्गदर्शन करीत आहेतच. योग्य ती औषधे योग्य त्या प्रमाणात देण्यासाठी उपचार पद्धतीबाबत टास्क फोर्सचे डॉक्टर्स कायम उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातल्या डॉक्टर्सनी सुद्धा त्यांच्या अडीअडचणी या तज्ञ डॉक्टर्सना मनमोकळेपणाने विचारणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
- उद्योगधंदे सुरूच राहतील
त्याही परिस्थितीत आणखी लॉकडाऊन लावावा लागला तरी उद्योगधंदे सुरूच राहायला हवेत. अर्थचक्राला झळ बसता कामा नये. मात्र त्यासाठी आपापल्या भागातील उद्योगांशी संपर्क साधून कामगार व मजुरांची राहण्याची व्यवस्था त्या उद्योगाच्या ठिकाणी किंवा स्वतंत्ररीत्या केली आहे का ते पाहण्याचे व त्याचे नियोजन आतापासून करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
- इतर राज्यातून येणाऱ्या मजुरांच्या नोंदी ठेवा!
गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवात होईल मात्र ते आपल्याबरोबर संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी प्रयत्न करतोय ते वाया जातील. यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग-व्यवसाय, पंत्राटदारांकडून व ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणे करून त्यांच्या चाचण्या, विलगीकरण याबाबत नियोजन करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.