10 सहभागींचा विविध राज्यात कोरोनामुळे मृत्यू, सहभागींचा देशभर संचार, संचालकांविरोधात गुन्हा नोंद होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मार्चच्या प्रारंभी दिल्लीत निझामुद्दिन या भागात तबलिगी जमात या इस्लाम धर्मीय संस्थेच्या मोठय़ा कार्यक्रमामुळे देशभर कोरोनाचा प्रसार झाला असल्याचे आता उघड होत आहे. या कार्यक्रमात भारताच्या जवळपास प्रत्येक राज्यातील मुस्लीम भाविकांनी सहभाग घेतला होता. त्याशिवाय शेकडो विदेशी भाविकही सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यात सहभागी झालेल्या अनेकांनी देशभरात संचार केला. या कार्यक्रमात भाग घेतलेल्यांपैकी 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले असून 24 जणांच्या चाचण्यांमधून कोरोना सिद्ध झाल्याने देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आता या कार्यक्रमाच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंद करण्याची घोषणा केजरीवाल सरकारने केली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो लोकांचा आता शोध सुरू झाला आहे.
या कार्यक्रमाला दिल्लीच्या राज्यसरकारने अनुमती दिली होती, असा आरोप केला जात आहे. तर या कार्यक्रमाच्या संचालकांवर माहिती व सहभागी लोकांची संख्या लपविल्याचा आरोप केजरीवाल सरकारने केला आहे. कठोर कायदेशीर कारवाई सर्व संबंधितांवर केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे.
कार्यक्रमानंतर देशभर संचार
तबलिगी जमात या कार्यक्रमात साधारणतः 3 ते 4 हजार लोकांनी सहभाग घेतला होता. हा कार्यक्रम 2 आठवडे चालला. त्यात तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि इतर अनेक राज्यांमधील भाविकानी भाग घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय, इंडोनेशिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात इत्यादी देशांमधील नागरीकही सहभागी झाले होते. कार्यक्रम झाल्यानंतरही एक आठवडा अनेक सहभागी लोकांचे जमातच्या मशिदीत वास्तव्य होते.
देशाच्या इतर भागांना भेटी
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या भाविकांनी नंतर देशभरातील इतर इस्लामी धार्मिक स्थानांनाही भेटी दिल्या होत्या. तेथील मरकझ कार्यक्रमांमध्येही ते सहभागी झाले होते, असे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या ठिकाणांमध्येही कोरोनाचा प्रसार झाला आहे, अशी शक्यता आहे.
1500 जणांना बाहेर काढले
तबलिग जमातच्या मशिदी आणि इतर इमारतींमधून आतापर्यंत 1500 लोकांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्या विलगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. त्यांची चाचणी घेण्याचा आदेश देण्यात आला आहे. निजामुद्दिन भाग पोलीसांच्या निरीक्षणाखाली असून येथून होणारा कोरोनाचा प्रसार रोखण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली. गेल्या आठडय़ात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लॉकडाऊनचे आवाहन केले होते. त्यानंतरही तबलिग जमातच्या इमारतीमध्ये 3 हजार लोक वास्तव्यास राहिले, असे आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे देशभरातील सरकारे सावध झाली आहेत.
आरोपांचा इन्कार
तबलिग जमातच्या संचालकांनी आरोपांचा इन्कार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रम राज्य सरकारची अनुमती घेऊन करण्यात आला. सर्व सरकारी नियम पाळण्यात आले. स्वच्छता आणि इतर बाबींची दक्षता घेण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या प्रसाराचा ठपका संस्थेवर ठेवण्यात येऊ नये, असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, साथग्रस्त वातावरण असताना कार्यक्रमाचे आयोजन का करण्यात आले आणि नेमके किती लोक आले होते, याची स्पष्ट उत्तरे संचालकांनी दिली नसल्याने संशय वाढला आहे.
आता शोधाशोध सुरू
कार्यक्रमात किती लोक सहभागी झाले होते, त्यापैकी कितीजणांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी किती लोक कोठे कोठे गेले, ते कोणाकोणाच्या संपर्कात आले, याची शोधाशोध आता प्रत्येक राज्याने हाती घेतली आहे. प्रत्येक राज्याने त्यासाठी विशेष पथके स्थापन केली असून शोधकार्य कसून सुरू झाले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी स्वतःहून समोर यावे आणि तपासणी करून घ्यावी, असेच आपण कोणाकोणाच्या संपर्कात आलो, त्याची माहिती द्यावी असे आवाहन आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडू तसेच कर्नाटकाच्या सरकारांनी केले आहे.
सहभागींपैकी 10 जणांचा मृत्यू
या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 10 जण कोरोनाच्या संसर्गामुळे विविध राज्यांमध्ये मृत्युमुखी पडले आहेत. यापैकी सहा लोकांचा एकटय़ा तेलंगणा राज्यात मृत्यू झाला आहे. याशिवाय तामिळनाडूत 1, कर्नाटकात 1, गुजरातमध्ये 1 तर केरळमध्ये 1 व्यक्तीने प्राण गमावल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या राज्यांच्या सरकारांची धास्ती वाढली असून सर्व सहभागींचा माग काढण्याचे आणि त्यांच्याकडून माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
सध्या चुका काढण्याची वेळ नाही
सध्या सारा देश आणि सरकार कोरोनाला रोखण्याच्या प्रयत्नांमध्ये मग्न आहे. अशा स्थितीत निजामुद्दिन भागात घडलेला प्रकार कसा घडला आणि जबाबदारी कोणावर आहे, याचा विचार करण्याची ही वेळ नाही. साऱयांनी एकजुटीने या राष्ट्रीय संकटाचा सामना केला पाहिजे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत केले.
समाज संक्रमणाची सुरवात ?
ड भारत अद्याप कोरोना संक्रमण आहे दुसऱया टप्प्यावरच
ड निजामुद्दिन कार्यक्रमानंतर सामाजिक संक्रमणाची सुरवात ?
ड सर्व राज्यांकडून कार्यक्रमात झालेल्यांचा कसून शोध सुरू
ड कोरोनाग्रस्त सहभागींचा हजारोंशी संपर्क आल्याची शक्यता