उचगांव /वार्ताहर
आमदार ऋतुराज पाटील यांनी उचगाव(ता.करवीर ) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची ऑनलाईन मीटिंग घेतली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांनी सोशल डिस्टन्स ठेऊन साधेपणाने उत्सव साजरा करावा.कार्यकर्त्यांनी स्वतःची, कुटुंबाची आणि गावातील लोकांची काळजी घ्यावी , असे आवाहन केले. मंडळांनी कोरोनाबाबत दक्षता घेतल्यास पोलीस ,प्रशासन, ग्रामपंचायत यांच्याकडून सर्व प्रकारचे सहकार्य राहील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.हा सण म्हणजे आपल्यासाठी उत्साहाचा सण असतो.
पण सध्या कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मंडळांनी वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा पद्धतीने छोटे मंडप उभे करणे, 4 फुटांपर्यंत मूर्तीची उंची ठेवणे, आगमन आणि विसर्जन मिरवणूक न काढणे, लोकांच्या सोयीसाठी ऑनलाईन आरती पाहण्याची सोय करणे, मंडपात आरतीला गर्दी न करणे, खर्चाला फाटा देऊन सोशल डिस्टन्स पाळून विधायक उपक्रम राबवणे , या गोष्टींकडे प्राधान्याने लक्ष द्यावे , असे सांगितले. उचगांवात दरवर्षी मोठया प्रमाणात गणेशोत्सव होतो.मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तो साधेपणाने व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
या बैठकीत बोलताना विजय गुळवे यांनी सांगितले की, शासनाच्या नियमाच्या अधीन राहून सर्व गणेश मंडळांची गणेशोत्सव साजरा करायची इच्छा आहे.त्यासाठी पोलीस, प्रशासन आणि ग्रामपंचायत पातळीवर आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य व्हावे. यावेळी शिवसेना करवीर तालुका प्रमुख राजू यादव ,रवी काळे, कीर्ती मसुटे, सचिन चौगुले, अजित माने,शिवाजी माळी,सचिन पोवार,सुरज यादव , विराग करी,प्रदीप माने ,अविनाश माने आदींनी सूचना मांडल्या.यावेळी ग्रा.प.सदस्य महेश खांडेकर, सचिन देशमुख विनायक जाधव आदी उपस्थित होते.