वार्ताहर / सोन्याळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉक डाऊन केल्यानंतर सर्वांना घरी बसण्याशिवाय पर्याय उरला नाही ऐन उन्हाळ्याच्या दिवसात संपूर्ण घरीच वेळ घालवत असताना अत्यावश्यक गरज बनलेल्या वीजेचा पुरवठा मात्र सोन्याळ 33 kv वीज उपकेंद्र कडून अखंडितपणे सुरू ठेवण्यात महावितरण कंपनी यशस्वी होत असल्याने येथील कार्यरत वायरमन आणि इतर कर्मचाऱ्याचे विशेष अभिनंदन होत आहे. जत तालुक्यातील सोन्याळ, माडग्याळ, लकडेवाडी आणि जाडरबोबलाद येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज पुरवठा खंडित होऊन नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून येथील कर्मचारी चोवीस तास अलर्ट आहेत. चोवीस तास सुरळीत वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी येथील कर्मचारी मेहनत घेत आहेत.
गावात कमी उंचीच्या पोलमुळे अडचणी निर्माण होत होत्या.अतिरिक्त पोल टाकून महावितरण कंपनीकडून तारांची उंची वाढवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी असलेल्या झाडांच्या फांद्यामुळे तारांचे एकमेकांशी घर्षण होत होते.त्यामुळे वारोवार वीजपुरवठा खंडित होत असे. त्या झाडांच्या फांद्या कापून काढून तो अडथळा दूर केला आहे. याकामी माडग्याळ महावितरण कंपनी कार्यालयाचे सहाय्यक अभियंता अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वायरमन लहू पवार, सागर म्हात्रे, संतोष वळवी, कल्याणी किटद, प्रधान यंत्रचालक प्रकाश माळी, अवणणा पुजारी,नबीसाब तिकोंडी,केराप्पा वाघमोडे आदीसह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आहेत.
दरम्यान या काळातही आवश्यक त्यावेळी वीजपुरवठा खंडित न करता जवळपास जास्तीत जास्त वेळ सलग वीजपुरवठा पुरविण्यात आल्याने संबंधित कर्मचाऱ्यांच्या कामाचे अभिनंदन करण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महावितरणकार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर फार मोठी जबाबदारी आहे.यातच येत्या काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली असल्याने वादळ वारे झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाल्यास कार्यालयापुढे मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये आणि अवकाळी परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून आवश्यक त्या सर्व साधनांची आताच पूर्तता करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.