प्रतिनिधी / सांगली
कोवीड-19
च्या संसर्गामुळे
जगभरात अभूतपूर्व अशी स्थिती
निर्माण झालेली आहे. जगभर
हजारो लोक मृत्युमुखी पडत
आहेत. जगभर व देशभर
स्थिती अत्यंत चिंतेची बनली
आहे. कोवीड-19 मुळे
जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
अशा या संकटाच्या वेळी
समाजाला आधार देण्यासाठी
सामाजिक उत्तरदायित्वाचे
भान ठेवून चितळे उद्योग समूहाने
1 कोटी 50 लाखांचा
निधी देऊन इतरांसाठी आदर्श
निर्माण केला आहे. यामध्ये
बी. जी. चितळे
भिलवडी स्टेशन यांच्याकडून
1 कोटी रूपये मुख्यमंत्री
सहाय्यता निधीसाठी तर चितळे
बंधू मिठाईवाले पुणे यांच्याकडून
50 लाख रूपये पीएम
केअर्स फंडासाठी देण्यात आले
आहेत. सदर निधीचे
धनादेश जिल्हाधिकारी डॉ.
अभिजीत चौधरी यांच्याकडे
सुपूर्द करण्यात आले. यावेळी
श्रीपाद चितळे, विश्वास
चितळे, गिरीष चितळे,
निखील चितळे हे उपस्थित
होते.
कोवीड-19
मुळे राज्य व देशात
उद्भवलेल्या संकटावर मात
करण्यासाठी सामाजिक बांधिलकेच्या
भावनेतून हा निधी दिल्याचे
श्रीपाद चितळे यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवेशी
निगडीत चितळे उद्योग समुह
असल्याने प्रशासनाकडून या
काळामध्ये संपूर्ण सहकार्य
होत असल्याबद्दल त्यांनी
प्रशासनाचे आभार मानले.
तसेच अशा या संकटाच्या
काळातही सामाजिक बांधिलकी
म्हणून चितळे उद्योग समुह
सुरू ठेवण्यात आला असून जास्तीत
जास्त दुध संकलन करीत आहे.
यासाठी उद्योग समुहाचे
कर्मचारीही सोशल डिस्टन्सिंग
पाळून अविरतपणे काम करीत
असल्याबद्दल श्रीपाद चितळे
यांनी त्यांचेही आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, देशासमोर उभ्या ठाकलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळी चितळे उद्योग समुह पुढे येऊन मदत करीत आला आहे. कोवीड-19 मुळे निर्माण झालेल्या संकट काळातही चितळे उद्योग समुहाकडून करण्यात आलेली मदत अत्यंत कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.