भाजपचे राहुल गांधी यांना प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संकट हाताळण्यास सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी श्वेत पत्र प्रसिद्ध केले आहे. यावरून आता भाजपने आता राहुल यांना प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाविरोधी लढा निर्णायक वळणावर असताना राहुल गांधी आणि काँग्रेसने राजकारण करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. भारताच्या कोरोनाविरोधी लढाईत अडथळे निर्माण करण्यासाठी राहुल गांधी यांनी अथक परिश्रम घेतल्याची खोचक टिप्पणी भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.
भारतात काही चांगले घडल्यास आणि देश चांगली कामगिरी करत असल्यास काँग्रेस नेत्यांचा जळफळाट होतो. राहुल गांधी यांना मग आवरत नाही आणि ते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या पूर्ण विषयावर एक प्रश्नचिन्ह लावण्याचे काम करतात अशी टीका पात्रा यांनी केली आहे.
योगदिनासह सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण होता. सोमवारी दिवसभरात सुमारे 87 लाख लोकांना लस देण्याची कामगिरी भारताने करून दाखविली आहे. देशभरात यावरून सकारात्मकता दिसून आली. याचदरम्यान मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद ख्घेत श्वेतपत्र प्रसिद्ध करणे दुर्दैवी असल्याचे पात्रा म्हणाले.
काँग्रेसकडून संकटातही राजकारण
देशात पहिल्यांदा लॉकडाउन लागू केले असता काँग्रेसने याला तुघलकी निर्णय ठरविले होते. काँग्रेस नेते आता वेळीच लॉकडाउन का लागू केला नाही अशी विचारणा करत आहेत. लस हवी असे म्हणणारे आता लसीमध्ये गायीचा सीरम असल्याचे म्हणत आहेत. अशा अफवांमुळे पंजाब आणि छत्तीसगड यासारखी राज्ये कोव्हॅक्सिन घेण्यास नकार देत आहेत. असे अनेक प्रकारचे अडथळे राहुल आणि काँग्रेस पक्षाने कोरोनाविरोधी लढाईत उभे केले असल्याच आरोप भाजप प्रवक्त्याने केला आहे.
काँग्रेसशासित राज्यांमध्ये ढिसाळपणा
कोरोनाची दुसरी लाट काँग्रेसशासित राज्यामधून सुरू झाली. काँग्रेसशासित राज्यांमध्ये याचा सर्वाधिक परिणाम दिसून आला, सर्वाधिक रुग्ण सापडले. सर्वाधिक मृत्यू काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले. काँग्रेसशासित राज्यांनी कोव्हॅक्सिन स्वीकारण्यास नकार दिला, तेथेच सर्वाधिक मृत्यूदर राहिला. श्वेतपत्र काढणाऱयांनी यावरही बोलावे असे पात्रा म्हणाले.