काही शाळा तयारीत, काहींची ‘वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका : पालकांच्या संमतीपत्रकावर शाळा सुरुचा निर्णय अवलंबून
प्रतिनिधी / रत्नागिरी
शासनाच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्हाभरात आज 23 नोव्हेंबरपासून इ. 9वी ते 12वी वर्गापर्यंतच्या शाळा गजबजणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरासह ग्रामीण भागातील शाळा व्यवस्थापनाने तशी तयारी ठेवली असली तरी पालकांच्या संमत्तीपत्रकावर पहिल्या दिवशी किती विद्यार्थी शाळेत येतात, याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील काही हायस्कूल्स सोमवारपासून सुरू होण्याच्या तयारीत आहेत, तर काही शाळांच्या प्रशासनाने अद्यापही ‘वेट ऍन्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. एकंदरीत शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयावर अद्यापही संभ्रम आहे. मात्र काही शाळांनी आपली शाळा सुरु करण्याची तयारी पूर्णत्वास नेल्याचेही चित्र आहे.
10 नोव्हेंबर 2020 च्या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या परिपत्रकानुसार नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास 23 नोव्हेंबरपासून मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटानंतर बंद असलेल्या शाळांचे दरवाजे सोमवारपासून उघडणार आहेत. यासाठी आवश्यक असणारे शाळांमधील सॅनिटायझेशन अनेक शाळांमध्ये पूर्ण झाले आहे. कामकाज सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, यासाठी ऑक्सीमीटर गन, सॅनिटायझर इत्यादी आवश्यक बाबींची पूर्तता शाळांनी केली आहे. शाळांच्या कामकाजात विद्यार्थ्यांचा 100 टक्के सहभाग असावा, यासाठी ग्रामीण भागातील शाळांनी पालक व विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधला आहे. त्याचप्रमाणे इ. 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची 50 टक्के उपस्थिती असणार असून विद्यार्थ्यांना पालकांचे संमतीपत्र घेऊनच शाळेत यावे लागणार आहे. शाळा सुरू होण्याची तयारी म्हणून शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱयांनी सर्वप्रथम शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत बैठक घेऊन पालकांच्या बैठका घेतल्या. पालकांच्या बैठकीनंतर शिक्षकांच्याही बैठकांचा सपाटा सुरू होता.
..तरीही जिल्हय़ातील 43 टक्के शाळा होणार सुरू
कोरोनामुळे बंद असलेल्या माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक सत्राला प्रारंभ होणार असल्याने जिल्हय़ातील शिक्षकांच्या कोरोना चाचण्यादरम्यान शुक्रवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्य़ात 1100 शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तर पालकवर्गाकडून समंतीपत्रासाठी पालकवर्गाचा निरुत्साह दिसत आहे. तरीही जिल्हय़ातील 43 टक्के शाळा सुरू करण्यात येतील, असे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱयांकडून सांगण्यात आले.
83 हजार 136 विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आव्हान
जिल्हय़ातील 9 वी ते 12 वी पर्यंतच्या 458 शाळांचे शैक्षणिक कामकाज सुरू करताना कोरोनाची बाधा टाळण्यासाठी 83 हजार 136 विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचे आव्हान आता प्रशासनासमोर आहे.