प्रतिनिधी/ बेळगाव
मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. कोरोनाच्या सावटाखाली प्रथमच मुस्लीम बांधवांना प्रार्थनास्थळाऐवजी घरात नमाज पठण करावे लागत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत सामाजिक अंतर ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
सोमवारी रमजानचा तिसरा दिवस. शनिवारी पहाटे पहिला रोजा झाला. दरवषी प्रार्थनास्थळात नमाज क्हायचा. इफ्तारीचे आयोजन व्हायचे. कोरोना महामारीचे संकट व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाज पठण करण्याची सूचना दिल्यामुळे घरातच नमाज केला जात आहे.
सध्या सर्व मशिदी बंद आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मशिदींची साफसफाई करून नमाज पठणासाठी चौघा जणांना मुभा देण्यात आली आहे. पोलीस दलाच्यावतीने त्यांना पासेसचे वितरण करण्यात आले आहे. या चौघा जणांच्या व्यतिरिक्त इतर कोणालाही मशिदीत नमाज पठण करण्यास मुभा नाही.
रमजान महिन्याला सुरुवात होण्याआधीच प्रत्येक पोलीस स्थानकात मुस्लीम समाजातील प्रमुखांची बैठक बोलावून त्यांच्याशी अधिकाऱयांनी चर्चाही केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय करावे आणि काय करू नये, यासंबंधीचे सल्लेही देण्यात आले आहेत. या महिन्यात दानधर्मावर भर दिला जातो.
कोरोना महामारीमुळे सर्वांच्याच धार्मिक आचरणावर काहीशी बंधने आली आहेत. बेळगावच्या शिवजयंतीला एक वेगळीच परंपरा आहे. ही मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोव्यातूनही शिवभक्त बेळगावला येत असतात. यंदा शिवजयंती व बसवजयंतीही घरातच साजरी झाली. शिवजयंतीची निघणारी मिरवणूकही शंभर वर्षांच्या इतिहासात प्रथमच रद्द करण्यात आली.
गेले तीन दिवस मुस्लीम बांधवांनाही लॉकडाऊनच्या चौकटीत राहूनच धार्मिक विधी करावे लागत आहेत. यासंबंधी क्लब रोडवरील मुस्लीम बांधव फैजुल्ला माडीवाले म्हणाले, दरवषी मशिदीत उपवास सोडण्याची प्रथा होती. यंदा लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला घरातच आपल्या कुटुंबीयांसमवेत राहून उपवास सोडावा लागत आहे. पाच वेळचे नमाजही घरातच करावे लागत आहेत. मानव जातीच्या रक्षणासाठी कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व बांधवांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.