२ हजार ४०० वारसांच्या खात्यात सानुग्रह सहाय्य जमा
प्रतिनिधी / सांगली
कोविड-19 मुळे मयत व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रूपये सानुग्रह सहाय्य राज्य आपत्ती मदत निधीमधून प्रदान करण्यात येत आहे. यासाठी कोरोनामुळे मयत झालेल्यांच्या वारसांनी mahacovid19relief.in या पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते.
या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत 5 हजार 781 अर्ज पोर्टलवर प्राप्त झाले आहेत. यातील 2 हजार 594 कोरानामुळे मृत्यू झालेल्यांच्या वारसांना अनुदान मंजूर झाले असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने अनुदान मंजूर केले असून शासनाने २ हजार ४०० कुटुंबांच्या खात्यात सानुग्रह सहाय्य जमा केले आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या ज्या वारसांनी अद्यापही पोर्टलवर अर्ज केला नसेल त्यांनी त्वरीत अर्ज करण्याचे आवाहन करून प्रलंबित अर्जांचा संबंधीत यंत्रणांनी तातडीने निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधिक्षक दिक्षीत गेडाम, आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, कोविड-19 या आजराने निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसास सानुग्रह सहाय्य 50 हजार रूपये देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. या अनुषंगाने mahacovid19relief.in या पोर्टलवर संबंधितांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अद्यापही ज्यांनी अर्ज केले नाहीत त्यांनी तात्काळ या पोर्टलवर लॉगीन करून अर्ज करावा. तसेच या संबंधात आलेल्या तक्रारींच्या बाबत अपिल झाले असल्यास तक्रार निवारण समितीने त्या तपासून घ्याव्यात. नामनिर्देशित अधिकाऱ्यांच्या स्तरावरील प्रलंबितता तपासून घेण्याबाबतही त्यांनी यावेळी निर्देशित केले.
जिल्ह्यात कोविड-19 या आजारामुळे मयत झालेल्या सर्व व्यक्तींच्या वारसांचे अर्ज पोर्टलवर येतीत या दृष्टीने महानगरपालिका व जिल्हा परिषदेकडील यंत्रणांनी खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. यावेळी त्यांनी 60 वर्षावरील सर्व नागरिकांना बूस्टर डोस देण्यात यावा. कोणीही वंचित राहणार नाही यासाठी दक्षता घ्यावी. फ्रंट लाईन वर्कर असणाऱ्या सर्वांनी डोस घ्यावेत. याबाबत कार्यालय प्रमुखांनी आवश्यक कार्यवाही करावी. जिल्ह्यात कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवावे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तजवीज करावी. महानगरपालिका क्षेत्रात एक आणि प्रत्येक तालुक्यात एक कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.